लोणी काळभोर : कोंबड्या घरांत शिरल्या म्हणून झालेल्या भांडणावरून चिडून पत्नीच्या सांगण्यावरून शेजा-याने महिलेच्या तोंड व गळ्यावर कु-हाडीने वार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना आळंदी म्हातोबाची येथे रात्री आठच्या सुमारास घडली. या प्रकरणी ज्ञानेश्वर गोरख जाधव (वय २२, रा. आळंदी म्हातोबाची, कोळसकर वस्ती, ता. हवेली) यांनी आपली मावशी नंदा रामदास माळी (वय ४५) हिचा खून शेजारी रहाणारे अनिल तुकाराम रणदिवे याने पत्नीच्या सांगण्यावरून केला असल्याची फिर्याद दिली आहे. खून करून रणदिवे आपल्या पत्नीसह फरार झाला आहे.गुरुवार (२३ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी रणदिवे यांच्या कोंबड्यांनी नंदा यांच्या झोपडीत घुसून गृहोपयोगी साहित्याची पडझड केल्याचे कारणांवरून दोघींमध्ये वाद चालला होता. थोड्या वेळाने दोघी शांत झाल्या व आपापल्या घरी गेल्या.रात्री आठच्या सुमारास अनिल रणदिवे व पत्नी रुक्मिणी हे नंदा हिला जाब विचारण्यासाठी गेले. रुक्मिणी ही आपल्या पतीस ‘ही माझ्याशी सारखीच कोंबड्यांवरून भांडण करते. हिच्याकडे बघाच’ म्हणली. त्यानंतर अनिल याने ‘तू माझ्या बायकोबरोबर भांडतेस काय,’ असे म्हणत हातातील कुºहाडीने नंदा यांच्यावर घावघातला. यामुळे त्या जमिनीवर कोसळल्या त्यानंतर त्याने तोंड व गळ्यावर सपासप वार केल्याने नंदा या तडफडू लागल्या. हे पाहूनतिला सोडवून अनिलला पकडण्यासाठी जाधव कुटुंबीय व अंकुश लोंढे हे पुढे आले असता त्याने त्यांनाही कुºहाडीने मारण्याची धमकी दिल्यामुळे कोणी पुढे आले नाही.याचा फायदा उठवून अनिल रणदिवे हा पत्नीसमवेत फरार झाला. तोपर्यंत त्या मयत झाल्या होत्या. पोलिसांनी रात्रभर अनिल रणदिवे व त्याच्या पत्नीचा शोध घेतला, परंतु ते दोघेही सापडले नाहीत.
कोंबड्यांच्या भांडणावरून महिलेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 01:29 IST