राजेवाडी : पुरंदर तालुक्यात होणाऱ्या प्रस्तावित विमानतळाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी असल्याची घोषणा केली असली, पुरंदर तालुक्यातील कोणत्या गावात होणार याविषयी संदिग्धता असली, तरी राजेवाडी ग्रामस्थांनी तातडीची बैठक बोलावून राजेवाडी-वाघापूर येथे होणाऱ्या प्रस्तावित विमानतळाला विरोध केला आहे.विमातळासाठी राजेवाडी-वाघापूरला जागेची पाहणी झाल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून राजेवाडीतील ग्रामस्थांची झोप उडाली होती. राजेवाडीतील संपूर्ण शेती घरादारासह विमानतळात जाणार असल्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले होते. ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभा बोलावण्यात आली होती. त्याही वेळी विमानतळाला विरोध करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदरमध्ये विमानतळाला एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या वतीने जाहीर केले असले, तरी शतकाऱ्यांची भूमिका ऐकून न घेता परस्पर निर्णय घेतला असल्याने गावातून संताप व्यक्त केला जात आहे. या वेळी बळीराजा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, हनुमंत थोरात, विलास कडलग, आनंदीबाई हराळे, माऊली बधे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी सरपंच पुष्पांजली बधे, दत्तात्रय जगताप, विलास खेडेकर, संदीप जगताप उपस्थित होते. (वार्ताहर)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशासनाकडून शेतकऱ्यांशी बोलणी केल्याची खोटी माहिती दिली आहे. राजेवाडीतील कोणत्याही शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली नाही. यामुळे कोणत्याही परिस्थितीत विमानतळ होऊ देणार नसल्याचा निर्णय ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतला.
विमानतळ होऊ देणार नाही
By admin | Updated: September 25, 2016 04:45 IST