इंदापूर : खडकवासला धरणातून १४०० क्युसेक्सने नुकतेच आवर्तन सोडले होते. यातील ३00 क्युसेक्स पाणी पुणे शहराला देण्यात आले. हडपसरपासून खाली ११०० क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडले, मात्र इंदापूरच्या तरंगवाडी तलावापर्यंत २० क्युसेक्स एवढेच पाणी पोहचले. मग, १०९० क्युसेक्स पाणी मुरले कोठे, असा प्रश्न विचारला जात आहे. माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी खडकवासला प्रकल्प सिंचन व्यवस्थापन उपविभागाचे, उपविभागीय अभियंता के. के. देवकाते यांच्यासह पत्रकारांना घेऊन तरंगवाडीत तलाव व परिसराची पाहणी केली. त्यावेळी ही वस्तुस्थिती उघड झाली. दि. ५ मे रोजी हे पाण्याचे चौथे आवर्तन मिळणे आवश्यक होते. मात्र ते दहा दिवस उशिरा १५ मे ला सोडण्यात आले. १४०० क्युसेक्स क्षमतेने खडकवासला कालव्यातून हे आवर्तन सोडण्यात आल्यानंतर ३०० क्युसेक्स पाणी पुणे शहरात देण्यात आले. हडपसरपासून खाली ११०० क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडण्यात आले. तरंगवाडीच्या अलिकडे दीड किलोमीटर अंतरावर ते २० क्युसेक्स एवढे रोडावले. काल ते तेथेच संपले. या संदर्भात माहिती घेतली असता, हडपसरपासून पुढे पाटस, यवत, दौंडपर्यंतच्या भागात हजारो शेतीपंप आहेत. सायफनची जाळे पसरलेले आहे. पिण्यासाठी सोडलेले पाणी शेती पंप व सायफनद्वारे उचलले जाते. पिण्यासाठी पाणी साठवताच येत नाही. या खेरीज इंदापूर तालुक्यात खडकवासला कालव्याच्या मार्गावर अनधिकृत अशी १२०० वीजजोड असल्याचा आरोप मखरे यांनी केला आहे. ती सुद्धा या काळात बंद ठेवण्यात आली नाही. याचाही फटका या आवर्तनाला बसला आहे. पाणी येणाऱ्या मार्गावर पिण्याच्या पाण्याच्या योजना असणाऱ्या गावांमधील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्यांना ही पाणी नाही. तरंगवाडी तलावात पाणी पोहोचले नाही. त्यामुळे इंदापूर शहराला देखील पिण्यासाठी पाणी नाही.(वार्ताहर)
१0९0 क्युसेक्स पाणी मुरले कोठे?
By admin | Updated: June 4, 2015 05:25 IST