लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मतदान करणे हा प्रत्येक मतदाराचा हक्क आहे. लोकशाही आणखी सशक्त होण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान केले पाहिजे तसेच नवमतदारांनी मतदार जागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अकराव्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन नुकतेच येथील जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. या वेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले की, २५ जानेवारी १९५० भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस. या दिनानिमित्त संपूर्ण देशात २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून २०११ पासून साजरा केला जातो. प्रत्येक पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करावी आणि मतदान करावे.