अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कोबी, बटाटा, वाटाणा आदी मालावर योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कोबी, जनावरांना खाद्य म्हणून घालत आहे. सध्या १ किलो कोबीला १ रुपया इतका बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी सर्वच बाजूंनी अधिक अडचणीत सापडला आहे.तालुक्याच्या पूर्व भागातून डिंभा उजवा कालवा व घोडनदी पाण्याने बारमाही वाहत असल्याने अवसरी, निरगुडसर, पारगाव, लाखणगाव, गावडेवाडी, मेगडेवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी आदी गावांतील शेतकरी नगदी पैसे मिळवून देणारी पिके घेत असतात. वरील गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हिवाळी बटाटा लागवड केली आहे. बटाटा काढणीला सुरुवात झाली असून १० किलो बटाट्याला ४० रुपये इतका कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली आहे. केलेला खर्चही सुटत नाही. त्याचप्रमाणे पूर्व भागात कोबी, फ्लॉवरची मोठी लागवड झाली आहे. कोबीला एक एकरला साधारण ४० हजार रुपये इतका खर्च येत असून सध्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत १० किलो कोबीला १० रुपये इतका बाजारभाव मिळत असल्याने एकरी खर्च केला त्यापेक्षा निम्मा खर्चही वसूल होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कोबीपिक शेतातच सोडून दिले आहे, तर काही शेतकऱ्यांनी कोबी गायीचा चारा म्हणून शेतातून आणला आहे. काही शेतकऱ्यांनी कोबीच्या उभ्या पिकात बकरे चरण्यासाठी सोडली असल्याचे पाहावयास मिळत आहे.शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कोणत्याच शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. मार्चअखेर जवळ आल्याने सोसायट्या बँकेने वसुलीसाठी तगादा लावल्याने शेतकरी सगळीकडून आर्थिक अडचणीत सापडला आहे. (वार्ताहर)
जनावरांना चारा देण्याची वेळ
By admin | Updated: February 8, 2017 02:43 IST