खळद : पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मंगळवारपासून पुढील २५ ते ३० दिवस शासकीय जमिनींच्या (ओएलएस) सूक्ष्म सर्व्हेला सुरुवात होणार आहे. त्यानंतरच ही जागा विमानतळासाठी योग्य की अयोग्य, हे समजेल. ही मोजणी नसून केवळ सूक्ष्म सर्व्हे असून त्याला शेतकऱ्यांनी विरोध करू नये, असे आवाहन शासनाच्या वतीने पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी यांनी केले आहे. शेतकरी मात्र त्यांच्या असहकाराच्या भूमिकेवर ठाम आहेत. प्रसंगी गोळ््या घाला पण विमानतळ होऊ देणार नाही असा त्यांचा पवित्रा आहे. पारगाव, खानवडी, एखतपूर-मुंजवडी, वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण परिसरात पॉईंट घेऊन त्यापासून २० किमीपर्यंतच्या भागातील हवेचा दाब, वाऱ्याचा वेग, जमिनीचा उंचसखलपणा, डोंगर या बाबींचा अभ्यास करण्यासाठी हा सर्व्हे केला जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांच्या आदेशानुसार पारगाव मेमाणे, खानवडी, एखतपूर-मुंजवडी आणि या प्रकल्पात नव्याने समावेश झालेल्या कुंभारवळण, वनपुरी-उदाचीवाडी या गावांत शासकीय सर्व्हेबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी आणि याकामी शेतकऱ्यांनीसहकार्य करण्याचे आवाहन करण्यासाठी सोमवारी शासनाच्या वतीने बैठका घेण्यात आल्या. या वेळी तहसीलदार सचिन गिरी यांच्यासमवेत उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, सासवडचे पोलीस निरीक्षक एस. आर. गौड, मंडलाधिकारी संजय बडधे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले आदी उपस्थित होते.
विमानतळासाठी आजपासून होणार सर्व्हे
By admin | Updated: November 15, 2016 03:56 IST