पुणे : विठ्ठलवाडी ते वारजे दरम्यान नदीपात्रात बांधण्यात आलेला रस्ता व सीमाभिंत उखडण्यास महापालिकेतर्फे शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली. मात्र तेथील रहिवाशांनी पालिकेच्या या कारवाईला विरोध केल्याने काम थांबविण्यात आले. नदीपात्रातील सीमाभिंत न पाडता केवळ रस्ता काढावा, अशी मागणी येथील रहिवाशांची आहे.सिहंगड रस्त्यावरील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून विठ्ठलवाडी ते वारजे दरम्यान नदीपात्रात अडीच किलोमीटरचा रस्त्या बांधण्यात आला. तसेच पुराचे पाणी नदीलगतच्या इमारतींमध्ये घुसू नये यासाठी सिमेंट काँक्रीटची भिंतही उभारण्यात आली आहे. मात्र, काही पर्यायवरणप्रेमींनी त्याविरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. लवादाने रस्ता उखडण्याचा निर्णय दिल्यानंतर या आदेशाला स्थगिती मिळविण्यासाठी पालिकेतर्फे सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले. न्यायालयाने लवादाचा निर्णय कायम ठेवल्याने शुक्रवारपासून पालिकेतर्फे रस्ता उखडण्याचे काम सुरू करण्यात आले. सकाळी दहाच्या सुमारास पालिकेचे अधिकारी यंत्रांसह नदीपात्रात दाखल झाले. भिंत पाडण्याच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर माजी नगरसेवक शैलेश चरवड, परिसरातील एकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष हेमंत जगताप यांच्यासह रहिवाशांनी एकत्र येत त्याला विरोध केला. रहिवाशांनी जोरदार विरोध केल्याने शुक्रवारी भिंतीचा काही भाग पाडून काम थांबविण्यात आले. जगताप म्हणाले, रस्ता उखडण्यास आमचा विरोध नाही. मात्र सीमाभिंत व भराव काढल्यास परिसरातील सोसायट्यांना पुन्हा पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत सोमवारी महापौर व आयुक्तांना भेटणार आहोत. काम चालूच राहणारसर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्याने रस्ता उखडण्याचे काम सुरूच ठेवले जाईल. तेथील रहिवाशांशी याबाबत चर्चा केली जाईल. त्यांना आदेशाबाबत समजावून सांगून त्यांच्या मनातील भीती घालविण्याचा प्रयत्न करू. काम खूप मोठे असल्याने वेळ लागेल. पण आदेशानुसार नदीपात्रातील बांधकाम काढावेच लागणार आहे.- विवेक खरवडकर, अतिरिक्त नगर अभियंता, महापालिका
नदीपात्रातील सीमाभिंत पाडण्याचे काम रोखले
By admin | Updated: March 28, 2015 00:58 IST