पिंपरी : हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) कंपनी सुस्थितीत सुरू करण्याची मागणी करीत गुरूवारी सकाळी पिंपरीतून मूक मोर्चा काढण्यात आला. काळे झेंडे फडकावीत केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. कामगारांनी सुरू केलेले धरणे आंदोलन तिसऱ्या दिवशीही कायम होते. कंपनी सुस्थितीत सुरू करून उत्पादन घ्यावे, नऊ महिन्यांपासून प्रलंबित वेतन आणि थकीत देणी अदा करावी, कंपनी पुनर्वसनाचा निर्णय मार्गी लावावा, या मागण्यांसाठी मंगळवारपासून प्रवेशद्वारासमोर एचए बचाव कृती समितीतर्फे कामगारांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज तिसऱ्या दिवशी कंपनी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक पुन्हा कंपनी, असा मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये कामगार आणि त्यांचे कुटुंबीय, विविध संघटनेचे कामगार प्रतिनिधी, नगरसेवक सहभागी झाले होते. चौकात झालेल्या सभेत कामगार नेते कैलास कदम, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, महंमद पानसरे, विजय लोखंडे, ज्ञानेश्वर कांबळे, नगरसेवक सद्गुरू कदम, अमिना पानसरे, एचए मजदूर संघाचे सचिव सुनील पाटसकर, अरुण बोऱ्हाडे आदी उपस्थित होते. भापकर म्हणाले,‘‘अच्छे दिन...चे स्वप्न दाखविण्याऱ्या केंद्र सरकारने कामगारांना उद्ध्वस्त करणारे निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून परिसरातील खासदारांच्या दारात धरणे आंदोलन करू.’’ दरम्यान, मोर्चाचा कंपनी प्रवेशद्वारावर समारोप झाला. धरणे आंदोलन कायम होते. नरेंद्र मोदी विचार मंचाने कामगारांची भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा दिला. (प्रतिनिधी)
‘एचए’चा मूक मोर्चा
By admin | Updated: March 20, 2015 01:10 IST