शिरूर : औद्योगिकीकरणाच्या टप्पा क्रमांक ३ साठी संपादित करण्यात आलेल्या तालुक्यातील रांजणगाव-गणपती, कारेगाव, करडे व बाभुळसर खुर्द या गावातील ११२०-४५ हेक्टर जमिनींपैकी ८१४ हेक्टर जमिनीवरील औद्योगिकीकरणाचे शेरे काढण्यात आल्याचे प्रांताधिकारी सोनप्पा यमगर व महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अजित देशमुख यांनी संबंधित गावच्या शेतकऱ्यांसमोर जाहीर केले. आठवड्यात शेतकऱ्यांचे सात-बारा कोरे होणार आहेत.मागील पंधरवड्यात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार बाबूराव पाचर्णे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन संबंधित चार गावांतील जमिनीवरील औद्योगिकीकरणाचे शेरे काढण्यासंदर्भात विनंती निवेदन दिले होते. या प्रलंबित प्रश्नाबाबत देसाई यांनी तत्काळ दखल घेऊन त्याच दिवशी अधिसूचनेनुसार स्वाक्षरी केली होती. या प्रक्रियेनंतर प्रांताधिकारी यमगर व एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी देशमुख यांनी आमदार पाचर्णे यांच्या कार्यालयाच्या आवारात आयोजित कार्यक्रमात शेरे काढण्यात आल्याचे जाहीर केले. १७ वर्षांपूर्वी ११२० हेक्टरवर औद्योगिकीकरणाचे शेरे पडले. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी औद्योगिकीकरणासाठी जमीन संपादनास विरोध दर्शवला. ज्यांनी विरोध दर्शवला नाही अशा शेतकऱ्यांच्या २९२.०७ हेक्टर जमिनीवरील औद्योगिकीकरणाचे शेरे तसेच ठेवण्यात आल्याचे यमगर यांनी सांगितले. गेली १७ वर्षे संबंधित चार गावांतील शेतकऱ्यांनी विविध प्रकारे आंदोलने केली. यमगर व देशमुख या अधिकाऱ्यांचा पाचर्णे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून निर्णयाचे स्वागत केले. (वार्ताहर)
आठवड्यात सात-बारा कोरे
By admin | Updated: July 4, 2015 00:02 IST