सध्याच्या कोरोनाच्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यातच विलगीकरण केंद्रे लांब ठेवल्याने नागरिक घरातच राहत आहे. यातून हा उद्रेक वाढतच चालला आहे.
या सर्वबाबी लक्षात घेऊन पुण्याच्या उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर यांनी आरोग्य अधिकारी व प्रशासनिक अधिकारी यांना बोलावून घेत औंध येथील औद्यगिक प्रशिक्षण संस्थेत गेल्या वेळी बनविलेले विलगीकरण केंद्र पुन्हा नव्याने सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार विलगीकरण केंद्र कार्यान्वित होत आहे.
या वेळी उपमहापौर सुनीता वाडेकर म्हणाल्या, की प्रभागात झोपडपट्टी भागात नागरिकांची घरे लहान लहान असून त्यांना लागण झाल्यास घरातच विलगीकरनामुळे उद्रेक वाढत चाललाय आणि यातच विलगीकरण केंद्रे बालेवाडी, येरवडा, खराडी अशा लांबच्या भागात केल्याने नागरिकांची गैरसोय होतेय म्हणून घरापासून जवळच प्रभागात हे केंद्र सुरू करण्यात येत आहे.
याचा लाभ नागरिकांना होणार आहे आणि झोपडपट्टयांमधील कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल. म्हणून हे १५० खाटांचे विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या वेळी रिपाई नेते परशुराम वाडेकर, औंध-बाणेरचे सहायक आयुक्त जयदीप पवार, कनिष्ठ अभियंता अश्विनी लांघी, डॉ. गणेश ढमाले, डॉ. वावरे, आरोग्य निरीक्षक गोपाळ भोईर उपस्थित होते.