पुणे : ‘नेमिची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे दर वर्षी शिक्षण मंडळाच्या धिम्या गतीच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर शैक्षणिक साहित्य उपलब्ध होत नाही. याही वर्षी महापालिकेच्या सर्व शाळा सुरू होऊन तीन आठवडे झाले, तरीही विद्यार्थ्यांना वही, पेन्सील, कंपास, रंगपेटी, विज्ञान व चित्रकला वही आदी शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही.महापालिकेच्या ३१० शाळांतील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश व शैक्षणिक साहित्य देण्याची घोषणा दर वर्षी केली जाते. त्यानुसार महापालिकेमार्फत शिक्षण मंडळाचा अर्थसंकल्प अगोदर तीन महिने (डिसेंबरअखेर) मंजूर केला जातो. २०१४-१५च्या अर्थसंकल्पात १ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार शैक्षणिक साहित्य खरेदीची प्रक्रिया जानेवारी ते मार्चअखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, शिक्षण मंडळाने जानेवारीमध्ये राबविलेल्या पहिल्या निविदा प्रक्रियेत ठेकेदारांनी प्रत्येक वहीसाठी २९ ते ३० रुपयांचा दर दिला होता. मात्र, ही किमत दुप्पट असून, शिक्षण मंडळाचे नुकसान करणारा असल्याचा आपेक्ष स्वयंसेवी संस्थांनी घेतला होता. अखेर पहिली निविदा प्रक्रिया रद्द करून आयुक्त विकास देशमुख यांनी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. मात्र, संपूर्ण प्रक्रिया प्रशासनामार्फत राबविली जात असल्याने शिक्षण मंडळातील कारभाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व शाळा १६ जूनला सुरू झाल्या, तरी वह्यांसह शैक्षणिक साहित्याचा अद्याप पत्ताच नाही. त्यामुळे महापालिकेचे लाखो विद्यार्थी शैक्षणिक साहित्याशिवाय तीन आठवड्यांपासून शाळेत शिकत असल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. (प्रतिनिधी)
शाळा सुरू झाली दप्तर मात्र रिकामेच!
By admin | Updated: July 3, 2014 05:40 IST