सलग पडणाऱ्या पावसामुळे आता पिंपरी-चिंचवड शहर परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. वाऱ्यामुळे विद्युत वाहिनीवर झाडे पडत आहेत. काही ठिकाणी विद्युत वाहिनी तुटणे, भूमिगत केबल तुटण्यामुळे वीज गायब होत आहे. त्यामुळे शहरवासीय पुरते हैराण आहेत. दुरुस्तीची कामे मार्गी लावण्यात कर्मचाऱ्यांच्या नाकी नाऊ येत आहे. शहर आणि ग्रामीण भागात ३ दिवसांपासून संततधार सुरू आहे. त्यामुळे शहरात महावितरणकडून होणाऱ्या वीजपुरवठ्यामध्ये बिघाड होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही भागात तर रात्रभर वीजपुरवठा बंद राहिल्यामुळे अंधारात राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. अनेक भागात वीजपुरवठा दिवसांतून ४ ते ८ वेळा खंडित होत आहे. खासगी, तसेच शासकीय कार्यालयांमध्ये विजेअभावी अर्धवट कामांमुळे खोळंबा होत आहे. शहरामध्ये एकीकडे विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त असतानाच वारंवार कराव्या लागणाऱ्या दुरुस्तीच्या कामामुंळे महावितरणचे कर्मचारी हैराण आहेत. भूमिगत केबलला खोदकामांदरम्यान धक्का लागून आता त्याला पाणी लागल्याने अशा वाहिन्यांमध्ये दोष असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अशा वाहिन्यांमधील दोष शोधणे व त्या दुरुस्तीसाठी खोदकाम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. तळवडे, रुपीनगर या भागात दोन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. मंगळवारी दिवसभर हा त्रास सहन केल्यानंतर बुधवारी सकाळपासून हाच प्रत्यय रहिवाशांना आला. दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. निगडी प्राधिकरणातील काही भागांतही मंगळवारी रात्री वीज गायब होती. बिघाड दूर करण्याचे काम बुधवारी सकाळपर्यंत सुरूच होते. सकाळी दहाच्या सुमारास काही वेळ वीज आली. पुन्हा ती खंडित झाली.दुरुस्तीकामी नवीन कर्मचारी भरतीमहावितरणने पिंपरी, भोसरी आणि प्राधिकरण वीज उपकेंद्रांमध्ये नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. पिंपरी वीज उपकेंद्राच्या अखत्यारीत बोपखेल, कासारवाडी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपरी, काळेवाडी, रहाटणी, वाकड, ताथवडे आदी मोठा भाग आहे. या भागात आधीचे २५० कर्मचारी कार्यरत आहेत. दुरुस्तीचा व्याप विचारात घेत ८० कर्मचाऱ्यांची भरती झाली आहे. भोसरी उपकेंद्रामध्ये नव्याने ६० कर्मचारी भरती झाली आहेत. प्राधिकरण उपकेंद्राच्या अखत्यारीत नवीन २० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
पाऊस सुरू; वीज बंद
By admin | Updated: June 25, 2015 03:33 IST