पुणे नाशिक महामार्गावरील नाणेकरवाडी हद्दीमधील तळेगाव चौकाच्याजवळील उड्डाणपूल असून, अडचण नसून खोळंबा झाला आहे. कचरा टाकणाऱ्या लोकांना उड्डाणपूल सोयीचा झाला आहे. उड्डाणपुलाजवळच विविध प्रकारचे पथारी व हातगाडी व्यावसायिक असतात. प्लॅस्टिक, थर्माकोल, हॉटेलमधील दूषित अन्न व कचरा, सडलेल्या भाज्या, मैला, रासायनिक तसेच घरातील कचरा व मटणाच्या दुकानातील खराब मटण, सडलेली अंडी, कोंबडीचे पंख आदी पदार्थ टाकले जात आहेत. कधी तरी उड्डाणपुलाखालील कचरा उचण्यात येतो, मात्र उड्डाणपुलावरील दुतर्फा टाकण्यात आलेला कचरा स्थानिक नागरिकांकडून जाळला जात असल्याने आग आणि धुरामुळे परिसरातील नागरिकांचे तसेच वाहनचालकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. कचऱ्याच्या ढिगावर कुत्री, कावळे, जनावरे आदी गर्दी करतात. यातून मिळेल ते पदार्थ तोंडात घेऊन पळ काढतात. अनेक प्राणी दुचाकी, चारचाकी वाहनांना धडक देतात. त्यामुळे अनेकदा अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. वाऱ्यामुळे या कचऱ्याच्या ढिगातील प्लॅस्टिकच्या पिशव्या महामार्गावर तसेच परिसरातील बाजारात उडून नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत. उड्डाणपुलावर आणि पुलावर व खालील बाजूस कचरा साचल्याने विद्रूपीकरण झाले आहे.
- पुणे नाशिक महामार्गावरील उड्डाणपुलावरील पेटवलेला कचरा.
उड्डाणपुलाखाली पडलेला कचऱ्याचा ढीग.