पुणे : गजेंद्र चौहान यांची अध्यक्षपदी नियुक्ती आणि इतर प्रश्नांसंदर्भात ७१ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची प्रथमच केंद्रीय पातळीवर सकारात्मक पद्धतीने दखल घेतली गेल्याने फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) चिघळलेल्या वादावर पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या अडी-अडचणी समजून घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने विद्यार्थ्यांच्या अपूर्ण प्रकल्प मूल्यांकन प्रक्रियेसह अन्य विषयांवर विस्तृत चर्चा झाल्याने संचालक, विद्यार्थी यांच्यासह प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. त्रिसदस्यीय समिती सोमवारपर्यंत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे अहवाल सादर करणार आहे. शुक्रवारी प्रथमच आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने एस. एम. खान, अंशू सिन्हा आणि सी. राजनाथ यांची समिती शुक्रवारी संस्थेत आली. या समितीने केवळ स्टुडंट असोसिएशनशीच नव्हे, तर टीचर्स आणि कर्मचारीवर्गाशीही चर्चा केली. एस. एम. खान म्हणाले, ‘‘संस्थेतील पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची त्वरित पूर्तता करणे, कर्मचारी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या समस्या यांसारख्या विषयांवर चर्चा झाली. प्राध्यापकांकडून काही चांगल्या सूचनाही मिळाल्या. या चर्चेनंतर चांगलेच निष्पन्न होईल, याबाबत आम्ही आशावादी आहोत.’’ आंदोलनाचे नेतृत्व करणारा विकास अर्स म्हणाला, ‘‘सोमवारपर्यंत चांगल्या निकालाची वाट पाहू. माझ्यासह राहत, सचित, शिनी, रणजित नायर, अजयन अडार असे सात जण चर्चेमध्ये सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)
‘एफटीआय’मधील वाद मिटण्याची शक्यता
By admin | Updated: August 22, 2015 02:14 IST