पळसदेव : सध्या कांद्याचे दर गगणाला भिडले आहेत. शुक्रवारपर्यंत कांद्याचा भाव सत्तरीच्या वर गेला होता. त्यामुळे ऐरव्ही दोन ते पाच रुपये प्रतिकिलो जाणारा कांदा आता ७० ते ७५ रुपये प्रतिकिलो झाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू तर सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यात आसू अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एरव्ही हॉटेल, ढाबे या ठिकाणी जेवण्यासाठी गेल्यास कांदा हमखास दिला जात होता. मात्र, कांद्याच्या वाढत्या दरामुळे हॉटेलचालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कांद्याऐवजी काकडी किंवा मुळा दिला जात आहे. कांदा हे पीक कमी दिवसात शेतकऱ्यांना आर्थिक प्राप्ती मिळवून देणारे पीक ओळखले जाते. परंतु, मागील ५ ते ७ वर्षाचा विचार केल्यास कांद्याला १० ते १५ रुपयांच्या पुढे दर मिळालेला नाही. त्यामुळे कांदा पिकाला हमीभाव देण्याची मागणी शेतकरी वेळोवेळी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी कांद्याला योग्य बाजारभाव नसल्यास पाचटाची आडी करून किंवा पत्र्याचे शेड उभारून कांद्याची साठवणूक करीत असत. मात्र, कांदा हा नाशवंत पीक असल्याने अनेक वेळा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यातच अवेळी पडणारा पाऊस, गारपीट, ढगाळ वातावरण यामुळे यावर्षी कांद्याच्या उत्पादनात घट झाली आहे. मागणी जास्त व पुरवठा कमी, असे गणित निर्माण झाल्याने कांद्याच्या दराने उसळी मारली आहे. एरव्ही अल्प बाजारभावात जाणारा कांदा आता मात्र ‘भाव’ खाऊ लागला आहे. दररोज कांद्याचे दर वाढतच असल्याने ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे कांदा आहे. ते शेतकरी खूष झाले आहेत. जणू काही आपल्याला लॉटरीच लागली असल्याच्या बोलकथा प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या तोंडून उमटत आहेत. शुक्रवारी कांद्याला दर प्रतिक्विंटल ७४०० पर्यंत गेल्याने आणखी कांद्याचा दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवलेला कांदा विक्रीसाठी बाहेर काढताना दिसत आहेत. सोलापूर, पुणे, मुंबई या ठिकाणी विक्रीसाठी कांदा नेला जात आहे. दरम्यान कांद्याचे दर गगणाला भिडल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू तर सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यात आसू येत आहे. कांदा हा दैनंदिन जीवनात वापरला जातो. मात्र, कांद्याच्या किमती आवाक्याबाहेर गेल्याने कांदा विकत घेणे अवघड बनले आहे. (वार्ताहर)
हॉटेलममधून कांद्याचे पदार्थ गायब
By admin | Updated: August 24, 2015 02:46 IST