लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पिरंगुट उद्योग परिसरात अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. यात केमिकल कंपन्यांचाही समावेश आहे. या कंपन्या कररूपात ग्रामपंचायतीला मोठी रक्कम दरवर्षी देत असतात. या ठिकाणी अग्निशमन केंद्राची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र, ती अद्यापही पूर्ण झालेली नाही. यामुळे एखादी दुर्घटना झाल्यास पीएमआरडीएच्या हिंजवडी, मान, म्हारुंजी, नांदेड या केंद्रांवरील बंबावर नागरिकांना अवलंबून राहावे लागते. यामुळे घटनास्थळी पोहचण्यास अनेक वेळा उशीर झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
पिरंगुट जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. येथील उद्योगांमुळे येथे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. नागरिकांचा विचार करता या ठिकाणी उपाययोजना होणे गरजेच्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून कुठलीच दखल घेतली जात नाही. हा परिसर पीएमआरडीएच्या हद्दीत येतो. या ठिकाणी विकासकामे राबविण्याची जबाबदारी पीएमआरडीएची आहे. मात्र, पायाभूत सुविधांचा अभाव येथे आहे. येथील कंपन्यात आगीच्या घटना या नेहमीच होतात. काही कंपन्यांत स्वत:च्या फायर सिस्टिम आहेत. मात्र, अनेक कंपन्यांत त्या नाहीत. आग लागल्यास ती विझवण्यासाठी स्थानिक टँकरवर किंवा पीएमआरडीएच्या म्हारुंजी, नांदेड, हिंजवडी, माण येथील केंद्रांवर अवलंबून राहावे लागते. घटनेची माहिती मिळाल्यावर बंब पोहचण्यास विलंब होत असतो. त्यात येथील रस्त्यांचीही दुरवस्था असल्याने घटनास्थळी पोहचण्यास विलंब होतो.
एवढा मोठा उद्योग परिसर असताना त्याठिकाणी स्वतंत्र अग्निशमन केंद्र असणे गरजेचे आहे. येथील कंपन्यांनीही तशी मागणी वारंवार प्रशासनाकडे केली आहे; मात्र अद्यापही त्यांची मागणी पूर्ण झाली नाही.
चौकट
अग्निशमन केंद्रासाठी जागेची पाहणी
पिरंगुट येथील उद्योग परिसर पाहता या ठिकाणी स्वतंत्र अग्निशमन केंद्र असावे, अशी मागणी खूप दिवसांपासूनची आहे. आगीची घटना झाल्यास हिंजवडी, म्हारुंजी, माण येथील बंब उपलब्ध होतात; पण येथील लोकसंख्येच्या दृष्टीने येथेच केंद्र असणे गरजेचे आहे. यासाठी उद्योगांनी एक जागा सुचवली होती. तसेच आमच्याकडूनही तीन जागांची पाहणी पूर्ण झाली आहे. लवकरच हे केंद्र उभारणीसाठी प्रयत्न केले जातील.
- अभय चव्हाण, तहसीलदार