बापू बैैलकर, पुणेमाऊलींची पालखी दर्शनबारीतच उतरविण्याचा निर्णय देवस्थान प्रशासनाने घेतला आहे. मात्र, तेथे काही अघटित घडले तर त्याची जबाबदारी ते घेणार का, असा सवालही होत आहे. तेथे गर्दीमुळे चेंगराचेंगरी होण्याची भीत आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शनबारीत याचे नियोजनच केले नसल्याने हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सोहळ्याला अवघे सहा दिवस राहिले असताना हा प्रश्न आहेच.आळंदी देवस्थानच्या वतीने सुमारे पाच कोटी रुपये खर्चून वारकऱ्यांच्या सोयीसाठी पूर्वीच्या गांधीवाड्याच्या ठिकाणी दर्शनबारी उभी राहिली आहे. या ठिकाणी यापूर्वी आजोळघरी पालखी आल्यानंतर पूजेची प्रथा आहे. येथे पालखी उतरवली जायची. मात्र नवीन बांधकामात पालखीसाठीच्या नियोजनाचाच विसर देवस्थानला पडला गेला. देवस्थानतर्फे दर्शनबारीत प्रवेशद्वारावर कट्टा बांधून मोकळ्या जागेत शेड बांधण्यात येणार आहे. मागे हॉलमध्ये दिंड्या व पूजाअर्चा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र तेथे जर पालखी उतरवली तर अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत पावसाळा सुरू आहे. शिवाय पालखीचे प्रस्थान रात्रीच्या वेळी ९ वाजता होणार आहे. आजोळघरी पालखीची पूजा, त्यानंतर महानैवेद्य, समाज आरती, रात्रीचा जागर असे प्रमुख कार्यक्रम याच ठिकाणी होतात, अशा वेळी वारकरी, दिंडीकरी, इतर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यामुळे त्या अपुऱ्या जागेत चेंगराचेंगरी होण्याचा धोका संभवतो. त्यात जर या कालावधीत मोठा पाऊस आला तर वारकरी दर्शनबारीत घुसू शकतात. अजून दर्शनबारीचे काम अपूर्ण आहे. या कामाच्या सक्षमतेचा दाखलाही अजून देवस्थान प्रशासनाने घेतला नाही. त्यामुळे इमारतीलाही धोका संभवू शकतो. पालखीबरोबर साधारण दीड ते दोन हजार भाविक असतात. त्यात दर्शनासाठीही वारकरी शिरकाव करू शकतात. यामुळे मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दर्शनबारीतील मधला जिना काढायचा हा एक कायमस्वरूपी पर्याय समोर आला आहे. मात्र त्या बांधकामाची रचना करताना हा जिना करण्यात आला आहे. आरसीसी बांधकाम असल्याने जर तो हलवला तर बांधकामालाही धोका संभवू शकतो. पालखी सोहळा सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. खेडचे प्रांताधिकारी हिंमतराव खराडे यांच्याशी संपर्क साधला असता, देवस्थान, विश्वस्त, मालक व चोपदार यांच्याशी चर्चा झाली असून, पालखी तेथेच उतरवायचा त्यांचा निर्णय झाला आहे. ती कुठे उतरावयाची हा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही. मात्र त्यांना प्रशासनाचे लागणारे सर्व सहकार्य करू. मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक औंधकर म्हणाले, की प्रशासनाचे त्यांना पूर्ण सहकार्य राहील. मात्र, तेथे बांधकाम चालू आहे. आम्हाला बांधकाम सक्षमतेसाठी कोणीही मागणी केली नाही. त्यामुळे तेथे पालखी उतरल्यास जे प्रश्न निर्माण होतील, याबाबत बोलू शकत नाही. हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. जेथे पालखी उतरवायची ते विचार करताहेत ती जागा अपुरी पडणार आहे. जर तेथे कोणता अघटित प्रकार घडला तर देवस्थान त्याची जबाबदारी घेणार का? असा सवाल करीत परंपरा मोडू नये ही माझी माफक अपेक्षा आहे. उद्या पालखी दुसरीकडे उतरली तर तोच पायंडा पडेल. या लोकांना दर्शनबारी करताना माऊलींचा विसरच पडला कसा? - बाळासाहेब आरफळकर, मालक दर्शनबारीत पालखीचे नियोजन न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. १0- १५ दिवसांपूर्वी हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता हा पेच सुटला आहे. त्यामुळे आता काहीच अडचण नाही. पालखी येथे उतरवणे ही परंपरा आहे. वारकऱ्यांची येथे श्रद्धा आहे. त्यामुळे दुसरा पर्याय योग्य नाही. येथेच सर्वांनी नियोजन करून व प्रशासनाने मदत करून सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी मदत केली पाहिजे.अवधूत गांधी, गांधीवाड्याचे मालक
माऊलींची पालखी दर्शनबारीतच उतरणार
By admin | Updated: July 4, 2015 00:01 IST