सासवड : कोणतेही मूलभूत ज्ञान मातृभाषेतूनच होत असते. इंग्रजी भाषेत शिकण्याच्या आग्रहामुळे नवीन पिढीत मराठी वाचक तयार होत नाहीत. यासाठी लेखकांनी असिधाराव्रत स्वीकारले पाहिजे. मराठी भाषा टिकवली पाहिजे व हे काम ग्रामीण भागातच होऊ शकते. ग्रामीण भागामुळेच मराठी टिकून आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ़ रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले़ आचार्य अत्रे प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेच्या वतीने आ. अत्रे यांच्या ४६व्या स्मृतिदिनानिमित्त साहित्य, पत्रकार व कला क्षेत्रातील मान्यवरांना अत्रे पुरस्काराने गौरवण्यात आले. डॉ. रंगनाथ पठारे यांना साहित्यिक, सुरेशचंद्र भटेवरा यांना पत्रकारिता, वैभव मंगले यांना कलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साहित्य परिषदेचे सासवड शाखेचे अध्यक्ष व समाजभूषण रावसाहेब पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते अध्यक्षस्थानी होते. वैभव मांगले यांनी मराठीच्या बोली भाषेकडे शहरी कलाकारांचे दुर्लक्ष होत आहे, असे सांगून कोणत्याही माणसाच्या मनात दु:ख, वेदना असतील तर तो काम मनापासून करतो, असे सांगितले. विजय कोलते यांनी पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला. सुनील महाजन, उल्हास पवार, रावसाहेब पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. शांताराम पोमण यांनी सूत्रसंचालन केले. हनुमंत चाचर यांनी आभार मानले. कार्यक्रमास गौरी कुंजीर, सुहास लांडगे, संजय ग. जगताप, तानाजी कोलते, गौरव कोलते, वसंत ताकवले, दशरथ ठवाळ, सुदाम इंगळे, नगरसेवक डॉ. राजेश दळवी, दशरथ यादव, अरुण जगताप, अण्णा खाडे, जयसाहेब पुरंदरे, बंडूकाका जगताप, महेश जगताप उपस्थित होते. (वार्ताहर)
ग्रामीण भागामुळे मराठी टिकून
By admin | Updated: June 13, 2015 22:36 IST