वरवंड: दौंड तालुक्यातील भीमा नदीकाठी असलेल्या हातवळण येथे सोमवारी सकाळी शेतात पाणी देण्यास गेलेल्या शेतकऱ्याला चक्क तीन बिबटे दिसले. सुदैवाने बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला नसल्याते शेतकरी बचावला. मात्र, या घटनेमुळे संपूर्ण ग्रामस्थ दहशतीखाली आहेत.
अनिकेत फडके हे सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्याना यावेळी एक नव्हे तर तब्बल तीन बिबट्या त्यांच्या शिवारात खेळत असताना दिसले. अनिकेत फडके यांचे नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले. ते रोज दुचाकीवरून शेतात जातात. मात्र त्यादिवशी चारचाकी घेऊन गेले. समोर बिबट्या पहिल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या बिबट्या बंदोबस्त करण्यासाठी या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या परिसरा मध्ये अनेकदा पशुधनावर बिबट्याचे हल्ले झाले आहे. मात्र, बिबट्या प्रत्यक्षात समोर दिसल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना चिंतेत पडले आहे. पिकांना पाणी द्यायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. सुरूवातीला विजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त होते. मात्र, आता बिबट्याच्या दहशहतीखाली ग्रामस्थ असल्याने शेतात जायचे कसे, असा प्रश्न हातवळण ग्रामस्थांना पडला आहे.
कोट
वनविभागाकडे पिंजरा लावण्यासाठी पाठपुरावा करून मागणी करणार आहे.
-योगेश फडके, सरपंच हातवळण
फोटो ओळ- अनिकेत फडके यांच्या शेतात खेळत असलेले बिबटे.