ज्येष्ठ गायक पं. शरद साठे म्हणाले, ‘अभिजात शास्त्रीय संगीतामध्ये घराणेशाहीला अनन्यसाधारण महत्व आहे. ग्वाल्हेर हे सर्व घराण्यांचे उगमस्थान आहे. हे घराणे ख्याल गायकीसाठी प्रसिध्द आहे. नख्खन तीरबक्ष हे घराण्याचे मुख्य गायक. पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी महाराष्ट्रात ग्वाल्हेर गायकीचा प्रचार आणि प्रसार केला. मी दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. त्यानंतर, पं. शरदचंद्र आरोळकर यांच्याकडूनही शिकलो. ग्वाल्हेर गायकीमध्ये तराणा, टप्पा, त्रिवट, हस्तपदी असे अनेक प्रकार गायले जातात. मात्र, ठुमरीचा फारसा प्रचार झाला नाही. सध्याच्या काळात शास्त्रीय संगीतातील स्पर्धा वाढली आहे. प्रत्येकाला झटपट नाव, प्रसिध्दी, पैसा हवा असतो. पूर्वीच्या गायकांनी घराण्याची परंपरा जपण्यासाठी खूप कष्ट घेतले. आताच्या पिढीकडे संगीताचा समृध्द वारसा हस्तांतरित केला. आताच्या पिढीने त्यांची उतराई होण्याची गरज आहे. गाण्यातील प्रत्येक परंपरा प्रयोगशील आहे. ही परंपरा वृध्दिंगत करताना आणि गुरुची शिकवण अवंलबताना स्वत:चा विचार गायकीत उतरायला हवा. नवोदित गायकांनी गुरुंची नक्कल न करता सर्जनशीलता जपल्यास गाणे जास्त खुलते. भाव, औचित्य, लावण्य, सौंदर्य गायनातून कल्पकतेने मांडल्यास ते गाणे दर्दी रसिकांपर्यंत पोचते. गायन करताना बंदिशीचा तालाबरोबर विस्तार करणे गरजेचे असते. भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताला समृध्द परंपरा आहे. ही परंपरा नष्ट होऊ नये, यासाठी मुळचा गाभा न बिघडवता, नावीन्यपूर्ण प्रयोग नक्कीच झाले पाहिजेत. प्रयोगशीलतेतून संगीताला नवी झळाळी मिळते. संगीत शिकताना किंवा सादर करताना लोकप्रियतेसाठी संगीताशी तोडजोड करुन चालत नाही. आजकाल काही गायकांचा उथळ प्रसिध्दीकडे कल असतो. मात्र, तात्पुरत्या प्रसिध्दीचा विचार केल्यास संगीताची साधना करता येत नाही. आजकाल गुरु-शिष्य परंपरेपेक्षा शिक्षक-विद्यार्थी प्रबळ होत आहे. पूर्वी गुरुच्या संगतीत राहून शिष्यांना त्यांचे आचार-विचार, संगीतात उतरवण्याची पध्दत जाणून घेता येत असे. आजकाल काही तास संगीत शिकण्याची पध्दत रुढ होत आहे. गुरु संगीताचे धडे देताना शिष्याच्या उन्नतीसाठी काय करता येईल, याकडे लक्ष देत असतो. सर्व दृष्टीकोनातून शिष्याला स्वावलंबी करुन स्वत:च्या पायावर उभे रहायला शिकवतो. अशा वेळी गुरुची शिकवण गायनात उतरवताना स्वत:ची शैली विकसित करणेही आवश्यक असते. भारतीय संगीत हा सुखसंवाद आहे. रसिकांची वाहवा मिळाल्याने गायकाला स्फुरण चढते. आजकाल, शास्त्रीय संगीताप्रमाणे इतर गायनप्रकारही प्रचलित होत आहेत. प्रत्येक गाण्याचा श्रोतृवर्ग वेगळा असतो. गाणे दर्जा आणि परिस्थितीवर अवलंबून असते. गायन आणि वादन परस्परपूरक असतात. त्यामुळे वादकांनाही गायनाची जाण असणे आवश्यक असते. गायनाची जाण येण्यासाठी मेहनत, विचार आणि परंपरा जपणे आवश्यक असते. लहान मुलांवर गायनाचे संस्कार झाले पाहिजेत. प्रत्येक जण गायक होईलच असे नाही. मात्र, शास्त्रीय संगीताची किमान जाण असेल तर कलेप्रती संवेदनशीलता वाढते. गायक निपजताना बाहेरच्या आमिषांना बळी न पडता रियाझावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. त्यासाठी रियाझामधून आवाजावर संस्कार करावे लागतात. संगीताची अपरिमित साधना करणे गरजेचे असते.
शास्त्रीय संगीतात नावीन्यपूर्ण प्रयोग व्हावेत
By admin | Updated: April 29, 2017 03:49 IST