इंदापूर : उजनी पाणलोट क्षेत्रातील नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या परिसरात एक ते दीड महिना पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. तर, तरंगवाडी तलावाची पाण्याची पातळी खालावल्याने विद्युत पंपाने पाणी खेचून सरस्वतीनगर येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा भार उजनी पाणलोट क्षेत्रामधील पाणीपुरवठा योजनेवर पडला आहे. परिणामी शहरात उद्यापासून दिवसआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होईल, असे चित्र आहे.यासंदर्भात उजनी पाणलोट क्षेत्राची ‘लोकमत’ने पाहणी केली. त्या वेळी माळवाडी येथील पाणीपुरवठा योजनेच्या परिसरातील पाणी नदीपात्रात किमान एक-दीड किलोमीटर पाणीपातळी गेल्याचे दिसून आले. माळवाडी येथील कार्यकर्ते गोकुळ व्यवहारे यांची पाणीपुरवठा योजनेजवळच जमीन आहे. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी सांगितले, की नेहमी पाणलोट क्षेत्रातील पाणी आमच्या जमिनीपर्यंत असते. यंदा ते एक ते दीड किलोमीटर आत सरकले आहे. ऐन उन्हाळ्यात ते आणखी आत सरकेल. त्या वेळी परिस्थिती अधिक बिकट होईल.पाणीपुरवठ्यासंदर्भात भ्रमणध्वनीद्वारे नगर परिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पाणीपुरवठ्याबाबत सत्तारूढ व विरोधी दोन्ही बाजूच्या बहुतांशी नगरसेवकांना काहीच देणे-घेणे नसल्याचे चित्र आहे. विरोधी गटातील नगरसेवक गजानन गवळीदेखील गप्प का आहेत, अशी विचारणा नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)
इंदापूरला दिवसाआड पाणी
By admin | Updated: March 16, 2015 04:19 IST