लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने फलाटावरचे प्रवेश शुल्क वाढवले. त्यामुळे अनावश्यक गर्दी कमी झाली, पण प्रशासनाचे उत्पन्न घटले व फलाटावरच फुकट मुक्काम ठोकणाऱ्यांना आता त्यासाठी पैसे मोजावे लागत आहे.
कोरोनामुळे रेल्वेलाही त्याचा फटका बसला आहे. नुकत्याच काही गाड्या सुरू झाल्या. मात्र, फक्त आरक्षण असणाऱ्या प्रवाशांनाच सध्या सगळ्याच फलाटांवर प्रवेश दिला जातो. इतरांंना फलाटावर येण्यास मनाईच आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी होऊन पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी कायम आहे.
महिला, वृद्ध, दिव्यांग यांना स्थानकात सोडण्यासाठी, गाडीत बसवून देण्यासाठी म्हणून कोणी मदतनीस आवश्यक असतो. अशानांच फक्त ५० रूपये देऊन फलाट तिकीट घेता येते व फलाटावर जाता येते. त्यांचा फलाटावरचा वावर त्यांची नियोजित गाडी सुटेपर्यंतच (कमाल २ तास) गृहीत धरला आहे. त्यामुळे फलाटावर फुकटचा मुक्काम ठोकणारे एकदम कमी झाले आहेत.
पुण्यातील लोकल सुरू केल्यात, पुणे लोणावळा दरम्यान दिवसभरात चार फेऱ्या होतात. त्यातही पोलिस आयुक्त कार्यालयाकडून अत्यावश्यक सेवेसाठी असे स्वाक्षरी व क्यूआरकोड प्रवेशपत्र असल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे या गाड्यांमधूनही फक्त गरज असलेले प्रवासीच प्रवास करतात.
पुण्यात २४ तासांमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांची संख्या १३० च्या दरम्यान आहे. दररोजच्या प्रवाशांची पुणे विभागातील संख्या २५ ते ३० हजारांच्या आसपास आहे. त्यातले सर्वाधिक पुणे शहरातून म्हणजे पुण्यातील स्थानकांमधून प्रवास करणारेच जास्त आहेत.