पुणे : आपल्याला झाडे आॅक्सिजन देतात, आनंद देतात, आपलं दु:ख विसरून इतरांसाठी जगण्याचे बळ देतात. म्हणून झाडांचे संवर्धन करायला हवे, असे मत वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण, पुणे विभाग) रंगनाथ नाइकडे यांनी व्यक्त केले.
भामचंद्र डोंगर येथे हभप निवृत्तीबुवा गायकवाड आणि सुभद्राबाई गायकवाड यांच्य स्मरणार्थ आयोजित सप्ताहात ते बोलत होते. आई-नाना प्रतिष्ठानतर्फे ''नव्या वर्षाची सुरवात, संत तुकाराम महाराजांच्या सहवासात'' ही संकल्पना राबविली. नवीन वर्षात भामचंद्र डोंगरावर येऊन तुकोबांचे स्मरण करून त्यांचे विचार आत्मसात करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यात अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवला. या उपक्रमातंर्गत डोंगरावर आई-वडिलांचे प्रतीक म्हणून वड, पिंपळ अशा झाडांची लागवड करण्यात आली. या वेळी बाळू लोंढे, शरद बुट्टे पाटील आदी उपस्थित होते.
नाईकडे म्हणाले, कोणताही समारंभ असेल तर झाड लावायला हवे. वाढदिवस किंवा इतर आनंदाचा क्षण असेल तर झाड लावून तो साजरा करायला हवा. त्या क्षणाची आठवण म्हणून ते झाड आपल्याला स्मरणात राहिल. ते झाड कायम आपल्याला आॅक्सिजन देईल. असे उपक्रम ठिकठिकाणी व्हायला हवीत. तरच भविष्यातील निसर्ग चांगला राहील.’’ कोरोनाचे संकट दूर होवो, अशी प्रार्थना देखील या वेळी करण्यात आली.