पुणे : पहिल्यांदाच जुलै व आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या दहावीच्या फेरपरीक्षेसाठी तब्बल १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे दहावीच्या निकालानंतर अर्ज करण्यासाठी खूप कमी कालावधी मिळूनही अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या परीक्षेला विद्यार्थ्यांनी पसंती दिल्याचे दिसते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहावीची फेरपरीक्षा आॅक्टोबरऐवजी जुलै व आॅगस्ट महिन्यात घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत तयारी केली. दहावीचा निकाल ८ जूनला जाहीर झाला. तर फेरपरीक्षा दि. २१ जुलैपासून सुरू होणार आहे. त्यामुळे मंडळाला संपूर्ण तयारीसाठी केवळ दीड महिन्याचा कालावधी मिळाला आहे. फेरपरीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज दि. १५ जूनपासून स्वीकारण्यास सुरुवात झाली. तर दि. २७ जूनपर्यत अंतिम मुदत देण्यात आली होती. सध्या विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जात आहेत. मात्र, दि. २८ जूपर्यंत मंडळाकडे सुमारे १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. अत्यंत कमी कालावधीत विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जाची संख्या खूप आहे, असे मंडळातील अधिकारीही सांगतात. (प्रतिनिधी)अभ्यासासाठी मिळाला कमी कालावधी फेरपरीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थी, श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठीही कमी कालावधी मिळाला आहे. आॅक्टोबरमधील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खूप वेळ मिळत होता. असे असतानाही अनेक विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा आताच देण्याचा निर्णय घेतला आहे. दहावी फेरपरीक्षेला २१ जुलैला सुरूवात होणार असून, दि. ५ आॅगस्टपर्यंत चालणार आहे. परीक्षेच्या तयारीसाठीही मंडळाला कमी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे परीक्षेचे नियोजन वेगाने केले जात आहे, असे राज्य मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
दहावी फेरपरीक्षेला दीड लाख अर्ज
By admin | Updated: July 4, 2015 00:18 IST