पुणे : लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर आता जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्रमा सुरू होणार आहे. आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५दरम्यान मुदत संपणाऱ्या तब्बल ७०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. यामुळे आता ऐन पावसाळ्यात गावच्या चावडीवर पुन्हा एकदा निवडणुकीची चर्चा रंगणार आहे. जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीचा जिल्ह्यात हा सर्वांत मोठा टप्पा असतो. यामध्ये अनेक आमदार, खासदार व राजकीय नेत्यांच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वीच जुलै ते डिसेंबरदरम्यान मुदत संपणाऱ्या सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या; पंरतु सहा महिने आगोदरच निवडणुका घेण्यास विरोध झाल्याने जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. तेव्हापासूनच जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे वेध लागले होते. अखेर मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. यामुळे आता ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीने वातावरण तापणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम
By admin | Updated: June 24, 2015 05:12 IST