मंचर : दोन हजार कोटी रूपये ऊस उत्पादकांना तातडीने देऊ असे सांगून सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. सहकार मंत्र्यांना वठणीवर आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोल्हापूर येथील चंद्रकांत पाटील यांच्या घरावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा बुधवार दि.१० जून रोजी काढला जाणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी बुधवारी रात्री केली.आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव-खडकी येथे राज्यव्यापी दुध आणि ऊस परिषद संपन्न झाली. त्यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन आणि आंदोलनाची दिशा स्पष्ट करताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील बोलत होते. यावेळी शिवाजीराव नांदखिले, प्रभाकर बांगर, पांडूरंग रायते, वनाजी बांगर, तानाजी बेनके, बाळासाहेब पठारे, कालीदास आपटे, आनंद शिंदे, लक्ष्मण शिंदे आणि राज्याच्या विविध भागातून आलेले ऊस उत्पादक आणि दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.ऊसाचा एफ.आर.पी.भाव १४ दिवसांत आणि एकरकमी देणे कारखाने आणि सरकारला बंधनकारक आहे, असे कायदा सांगतो जर सरकारच कायदे पाळत नसेल तर शेतकऱ्यांनी का कायदा पाळावा असा सवाल करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकरी संपविण्यासाठी पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे देशाची वाटचाल अराजकतेच्या दिशेने चालू झाली आहे असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला़ दुधाच्या दराबाबत बोलताना रघुनाथ दादा पाटील म्हणाले, दुध पावडर निर्यातीवर बंदी आणल्यामुळे दुध व्यवसायाला घरघर लागली आहे. या सरकारच्या अगोदर असणाऱ्या सरकारने दुधाच्या पावडरला अनुदान देत होते. परंतु विद्यमान सरकारने दुधाच्या पावडरवरील अनुदान बंद करून दुध उत्पादकाची चेष्टा सुरू केली आहे. यावेळी शिवाजीराव नांदखिले,पांडूरंग रायते,वनाजी बांगर,आनंद शिंदे,लक्ष्मण शिंदे,बाळासाहेब पठारे,कालीदास आपेट यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रभाकर बांगर यांनी केले. (वार्ताहर)सहकार मंत्री चंदक्रांत पाटील यांनी सरकारच्या वतीने २ हजार कोटी रूपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्याची घोषणा २ महिन्यापूर्वी केली. परंतु अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह सर्वांचेच अर्थकारण कोलमडले आहे. जून महिना सुरू झाला आहे. शेतीच्या पेरणी,मशागतीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. आडसाली ऊस लागवड करण्याची वेळ आली आहे. शाळेचे दिवस सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या वह्या पुस्तकांसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. अशा परिस्थितीत शेतकरी असताना सरकारला मात्र शेतकऱ्यांबाबत आस्था नाही़- रघुनाथदादा पाटीलराज्य अध्यक्ष शेतकरी संघटना
सहकारमंत्र्यांच्या घरावर मोर्चा
By admin | Updated: June 4, 2015 22:55 IST