लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वारंवार मागणी करूनही पीकविम्याचे पैसे जमा करत नसल्याने भारती एक्सा या कंपनीच्या ढोले पाटील रस्ता येथील कार्यालयात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी ठिय्या आंदोलन केले.
संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी सांगितले की वारंवार शांततेत निवेदने देऊनही कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई जमा होत नाही. आधीच नुकसान झालेले शेतकरी त्यामुळे त्रस्त झाले आहेत.
पंचनामा वगैरे सर्व कायदेशीर पूर्तता झालेली असतानाही हा विलंब केला जातो. काहीही कारणे सांगून शेतकऱ्यांना नाडले जाते. विमा देणे नाकारण्याचाच हा प्रकार आहे. यावर सरकारने कारवाई करायला हवी. मात्र, सरकारही याकडे डोळेझाक करत आहे, अशी टीका गायकवाड यांनी केला.
शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत. तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. कार्यालयात कंपनीच्या विरोधात घोषणा देत गोंधळ घातला.
दयानंद चौधरी, मधुकर चौधरी, भारत चौधरी, गोटू पाटील, बाबा तानवडे, अक्षय मते, नीलेश चौधरी, बजरंग चौधरी, विनोद कदम, मुन्ना गवळी, समाधान कदम, भगवान चौधरी, शीतल चौधरी, ज्ञानदेव गायकवाड, श्रीहरी गायकवाड, सुरज चौधरी, सिद्धू चौधरी उपस्थित होते.