पुणे : “पालिकेकडून एचसीएमटीआर प्रकल्प उभारला जाणार होता. त्याची निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली. मात्र, जादा दराने निविदा आल्याने ही निविदा रद्द करण्यात आली. भविष्यात पर्यावरणाचा विचार करून ‘एचसीएमटीआर’ऐवजी निओ मेट्रोचे नियोजन करावे. कमी खर्चाचा हा प्रकल्प हायब्रीड कॉरिडॉरमध्ये परावर्तित करायचा किंवा निओ मेट्रो करायचा याचे नियोजन करावे. महामेट्रोला आराखडा करण्याचे आणि प्रकल्पाचे काम द्यावे,” अशा सूचना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पुणे महापालिकेच्या ‘पुण्यदशम’ या दहा रुपयांत दिवसभर वातानुकूलित बस प्रवास योजनेचा प्रारंभ फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ९) करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक आदी या वेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, पुण्याला प्रदूषणमुक्तीसाठी ‘स्वच्छ बस आणि स्वच्छ इंधन’ आवश्यक आहे. भविष्यात मेट्रो सुरू झाल्यानंतर मेट्रो आणि बससाठी सिंगल तिकीट योजना सुरू केली जाणार असून, लोकांना बससंदर्भात एकत्रित माहिती देणारे मोबाईलचे डिजिटल अॅप तयार केले जाणार आहे. त्यावर प्रवाशाला आपला संपूर्ण ‘ट्रॅव्हल प्लान’ करता येणार आहे.
देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक बस पुण्याने खरेदी केल्या. लोकांना सार्वजनिक वाहतुकीची सवय लागायला हवी. मेट्रोचे काम वेगात सुरू असून त्याची चाचणी सुरू आहे. नागपूर आणि पुण्यात वेगात काम झाल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले. चंद्रकांत पाटील म्हणाले, रामभाऊ म्हाळगी यांनी सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम केले. ‘पुण्यदशम’ बसच्या माध्यमातून शेवटच्या माणसाचा विचार झाला आहे. “आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा आणि आरपीआय १०५ जागा जिंकेल. तिन्ही पक्ष एकत्र लढले तरी त्यांचा पराजय पक्का आहे,” असे बापट म्हणाले.
चौकट
“रामभाऊ म्हाळगी जन्मशताब्दीच्या निमित्ताने ही योजना सुरू केली. सर्वसामान्यांना परवडणारी योजना आहे. उच्च दर्जाची सेवा अल्प दारात उपलब्ध करून दिली आहे. राज्य सरकारकडून पैसे न घेता पालिकेने कोरोना संकटाचा सामना केला. पुणेकरांवर करवाढ न लादता उत्पन्नात वाढ केली. आता सारसबाग येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान आणि नानाजी देशमुख कॅन्सर हॉस्पिटलचीही उभारणी केली जाणार आहे.”
- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती