पुणे : सिंहगड रस्त्यावर वडगाव पुलावर, गुरुवारी (दि. ११) झालेल्या अपघातात ८ निष्पापांचा बळी गेला. १ आॅक्टोबर २०१० पासून कात्रज देहूरोड मार्गावर ६ पदरीकरणाचे काम सुरू आहे. ३१ मार्च २०१३ ला संपणे अपेक्षित असलेल्या या कामाला झालेल्या २.५ वर्षांच्या विलंबामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात घडत असून या दिरंगाईस जबाबदार असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाने पोलीस आयुक्त के. के. पाठक यांच्याकडे केली आहे. रस्त्यांच्या या कामाच्या दिरंगाईमुळे आजपर्यंत दीडशेजणांचे बळी गेले असल्याचेही वेलणकर यांनी मागणीत नमूद केले आहे. या रस्त्यावर २० अपघातप्रवण जागा असल्याचे वाहतूक पोलिसांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून वारंवार कळविण्यात येत आहे. मात्र. त्या मागणीनुसार, केवळ कंत्राटदाराला खलिते पाठविण्याशिवाय महामार्ग प्राधिकरणाने काहीही केले नाही. त्यामुळे प्राधिकरण व कंत्राटदार या दोघांच्या बेजबाबदारपणा व दुर्लक्षपणामुळेच प्राणघातक अपघातांची मालिका सुरू आहे. किमान आता तरी आपण जबाबदार अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी आमची मागणी आहे. तसेच वाहतूक नियंत्रण सोडून रस्त्याच्या कडेला फक्त असंघटित दुचाकीस्वारांची शिकार करणाऱ्या आणि चारचाकी गाड्यांच्या काळ्या काचांवर कारवाई करून पुरुषार्थ गाजविणाऱ्या परंतु अनधिकृत वाहतुकीकडे अनधिकृत थांब्यांकडे, ओव्हरलोड जड वाहनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहतूक पोलिसांवरही कारवाई करावी, अशी मागणी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, विश्वास सहस्रबुद्धे यांनी केली आहे.
अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
By admin | Updated: June 13, 2015 04:48 IST