लोणी काळभोर : आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत. सर्वच राजकीय पक्षांना इतर कोणतेही ठोस मुद्दे नसल्याने लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या थेऊर येथील बंद पडलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याची आठवण येऊ लागली आहे. या निवडणुकीतही हवेलीत यशवंत बंद या प्रश्नाच्या भांडवलावरच लढवली जाणार हे नक्की झाले आहे.निवडणूक आल्यावरच राजकीय पुढाऱ्यांना केवळ एकगठ्ठा मतांसाठी यशवंत कारखान्याची आठवण होते. विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आपल्या सोयीनुसार यशवंत बंद पडला, या विषयाचा वापर करून केवळ आश्वासनांचे गाजर दाखवून शेतकरी सभासदांच्या भावनांशी खेळ करून निवडणुकीपुरता हा विषय भिजत ठेवूत मते मिळवतात. इतरवेळी मात्र त्यांना त्याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. कारण या विषयांवर राजकारण करून निवडून येऊन सत्तेत मश्गूल झालेले विद्यमान खासदार व आमदारही अद्यापही याविषयी मौन बाळगून आहेत. या परिसरातील ऊस नेण्यास कुट्टीच व गुऱ्हाळचालक टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्यांना त्यांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. बाजारभाव व ऊसबिलाची खात्री नसतानाही केवळ नाइलाज म्हणून शेतकऱ्यांना कुट्टी व गुऱ्हाळमालकांची मनधरणी करावी लागत आहे. या कारणामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी हतबल झाला आहे. यशवंत सुरू करण्याचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाने घ्या, परंतु कारखाना सुरू करून येथील शेतकऱ्यांचे संसार वाचवा, अशी भावना व्यक्त होत आहे. यशवंतची चाके आर्थिक गर्तेत खोल अडकल्याने संबंधित सहकारी संस्थांवरही त्याचा प्रभाव दिसून येत आहे.हवेली तालुक्यातील यशवंत कारखाना व हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती ह्या सहकारी संस्था तालुक्याच्या मुख्य रक्तवाहिन्या मानल्या जात होत्या व येथूनच सहकाराच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबातील काही जण आमदार, खासदार, विविध बॅँकेचे संचालक व तालुक्यातील महत्त्वाच्या पदी निवडले गेले. त्यामुळे एकेकाळी यशवंत व हवेलीचा जिल्ह्यातील राजकारणात दबदबा होता. परंतु काही संचालकांच्या गलथान व भ्रष्ट कारभारामुळे यशवंतला घरघर लागल्याने तालुक्याच्या शेतकरी सभासदांचे अर्थकारण मंदावले आहे. या भागातील ऊसपिकाचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. (वार्ताहर)
‘यशवंत’च्या भांडवलावरच होणार निवडणूक
By admin | Updated: January 28, 2017 00:15 IST