लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या ग्रामपंचायतीत येत्या ९ व १० फेब्रुवारी रोजी सरपंच पदाची निवडणूक होत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या संदर्भात सर्व तहसीलदारांना आदेश देऊन सरपंच/उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून अव्वल कारकून, मंडल अधिकाऱ्याची अथवा समकक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यास सांगितले आहे.
कोरोनाच्या संकटानंतर जिल्ह्यात प्रथमच मोठ्याप्रमाणात ग्रामपंचायत निवडणुका घेण्यात आल्या. यात जिल्ह्यात सरपंचपदाचे आरक्षण सोडतदेखील केले होते, परंतु शासनाने नंतर राज्यातील जाहीर झालेली सरपंचपदाचे आरक्षण रद्द करून निवडणुका झाल्यानंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यास सांगितले. जिल्ह्यात नुकतेच नव्याने सरपंच आरक्षण सोडत काढली आहे. येत्या ९ व १० फेब्रुवारी रोजी सरपंचपदाच्या निवडणुका होणार आहेत.
दरम्यान, पुरंदर तालुक्यातील पिंगोरी, हवेली तालुक्यातील शेवाळेवाडी, औताडे-हांडेवाडी व बारामती तालुक्यातील माळेगाव या चार ग्रामपंचायतीमध्ये एक द्वितीयांशइतकी सदस्यपदे निवडून आलेली नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रशासक नेमणेबाबत संबंधित गटविकास अधिकारी यांना लेखी आदेश दिले आहेत.