निवडणूकीचे चित्र स्पष्ट : अनेक ग्रामपंचायती बिनविरोध तर काही गावात होणार चुरशीच्या लढती, प्रचाराचा नारळ फुटणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनामुळे रखडलेल्या जिल्ह्यातील ७४८ ग्रामपंचायतींचे चित्र सोमवारी अर्ज माघारीच्या दिवशी स्पष्ट झाले. निवडणुक लागलेल्या या ग्रामपंचायतींपैकी काहींनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार बिनविरोध केल्या. मात्र, अनेक ठिकाणी उमेदवारांनी अर्ज माघारी न घेतल्याने निवडणुकी लागल्या आहेत. गावकारभाऱ्यांच्या निवडीचा फड यामुळे रंगणार आहे. अनेक इच्छूकांनी आपले पॅनल रणधुमाळीत उभे केल्याने काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती पाहायला मिळणार आहे. सरंपंचपदाचे आरक्षण अजुन जाहिर झाले नसले तरी काहींनी नारळ फोडत प्रचाराचा शुभारंभ केला आहे. १५ जानेवारीला निवडणुका होणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण यामुळे ढवळून निघणारआहे.
जिल्ह्यातील १४०० ग्रामपंच्यातींपैकी काही ग्रामपंचयातींची मुदत ही डिंसेंबर महिन्यात संपली. या निवडणुका गेल्या वर्षी होने अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे निवडणुक कार्यक्रम जाहिर होण्यास उशीर लागला. यामुळे मुदत संपलेल्या ७४८ ग्रामपंचायतींवर प्रशासन नेमण्यात आले. यामुळे निवडणुक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणुक आयोगाने ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहिर करत जानेवारीच्या १५तारखेला निवडणुक घोषित केल्या. यासाठी आरक्षण घेण्यात आल्याने अनेक इच्छुकांच्या आशा वाढल्या होत्या. मात्र, सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर होणार असल्याने अनेकांच्या इच्छा मावळल्या होत्या. असे असले तरी आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी केली. २३ ते ३० डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. ३१ जानेवारी रोजी छाननीत अनेकांचे अर्ज बाद झाले. निवडणुक कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन करण्यात आले. याला प्रतिसाद देत अर्ज माघारीच्या दिवशी सोमवारी अनेकांनी अर्ज मागे घेत निवडणुका बिनविरोध केल्या. मात्र, अनेक बड्या ग्रामपंचयातीत सत्ताधारी आणि विरोधकांनी आपले अर्ज कायम ठेवल्याने निवडणुका लागल्या आहेत.
निवडणुक रिंगणात अनेक मातब्बर असल्याने या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. प्रचाराचा नारळ फाेडत पॅनल प्रमुखांनी सोमवारीच प्रचाराचा शुभारंभ केला. यामुळे येत्या १० दिवसांत गावातील राजकारण ढवळुन निघणार आहे. मंगळवार पासुन गावात कोपरा सभा, रोड शो, निवडणुक रॅल्या काढत मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न उमेदवार करणार आहेत.
चौकट
प्रचारासाठी राबणार हायटेक यंत्रणा
अनेक ग्रामपंचयातीत निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामुळे उमेचारांनी प्रचाराची तयारी सुरू केली आहे. एरवी खासदार, आमदारकीच्या निवडणुकांत हायटेक यंत्रणेचा वापर उमेदवारांमार्फत केला जात होता. मात्र, ग्रामपंचयात निवडणुकांतही उमेदवार मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी हायटेक यंत्रणांचा वापर करणार आहेत. यात सोशल मिडियाला प्राधान्य उमेदवारांनी दिला आहे. गेल्या वर्षात गावाच्या विकासाची उदाहरणे देत रखघडलेल्या कामांचा पंचनामा करत गावविकासासाठी अनेक योजनाही या माध्यमातून उमेदवारांपर्यंत पोहचवील्या जात आहेत.
चौकट
रात्री उशीरा पर्यंत सुरू होती प्रक्रीया
जिल्ह्यात ७४८ ग्रामपंचायतींच्या अर्ज माघारीची प्रक्रिया सोमवारी पार पडली. सकाळ पासुन सुरू झालेली ही प्रक्रिया रात्री उशीरा पर्यंत तालुक्याच्या ठीकाणी सुरू होती. यामुळे किती ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या याचे चित्र स्पष्ट होऊ शकले नाही.