लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात शेतीच्या कामे करण्यासाठी कायम मजुरांची टंचाई भासत आहे. मजुरीचे दरही पूर्वीच्या प्रमाणात वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. बारामती परिसरात आठ दिवस मजुरांचे वेटिंग करावे लागत आहे. वेळेवर मजूर मिळत नसल्याने शेतातील कामे प्रलंबित राहत असल्याचे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
पेरणी, खुरपणी, तण काढणे, खत टाकणे, तोडणी करणे यासारखी कामे करावी लागतात. यासाठी मजुरांची आवश्यकता नेहमी भासते. खरीप आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीला पूर्व मशागतीच्या कामांसाठी मजुरांची आवश्यकता भासते. एका मजुराचा दिवसाचा दर हा पूर्वी १५० रुपयांपयर्यंत होता. मात्र, हे दर आता वाढले आहेत. महिला कामगाराला जवळपास २०० ते २५० तर पुरुष कामगाराला ३०० पर्यंत दर आहे. एकीकडे खतांचे, बियाणांचे भाव वाढल्याने शेतीचा खर्चात वाढ झाली आहे. त्यात मजुरांचाही खर्च वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. शेतात जे पिकेल त्याला चांगला भाव मिळेल याची शाश्वतीही राहिलेली नाही.
जिल्ह्यात ऊस, कांदा, द्राक्ष, टोमॅटो, बटाटा, सोयाबीन, तसेच तरकारी पिकांचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते.
उसाला चांगला दर असल्यामुळे मजुरीचा दर ही गगनाला भिडले आहेत. मजूर सांगतील ठरवतील तो दर शेतकऱ्याला द्यावा लागतो, उसाची मशागत, लागवड, खांदणी बांधणी याचे दर शेतकरी न ठरवता मजूरच ठरवत असतात. उसाची एकदा खांदणी बांधणी झाली की तशी या पिकाला मजुरांची फारशी गरज पडत नाही. मात्र ऊस तुटून गेल्यावर गहू, सोयाबीन, टोमॅटो इतर भाजीपाल्यासाठी मात्र मजुरांचा तुडवडा जाणवतो, ज्या पद्धतीचे पीक तसा मजुरीचा दर असतो.
ज्वारी, मका कडवळ, कांदा व इतर भाजीपाल्याची पिके घेतात. वरील सर्वच पिके ही तीन ते चार महिन्याची असतात. त्यामुळे जिरायती भागात नेहमीच शेती मजुरांचा तुटवडा जाणवत असतो. या भागातील शेतकऱ्यांना रोजच मजुरांची गरज पडते.
——-
काय म्हणतात शेतकरी ?
मजुरांचा तुटवडा हे आता नित्याचेच झाले आहे. महिला कामगाराला २०० तर पुरुषाला ३०० रुपये रोज ते ठरवतील तो दर असतो, शेतकऱ्याच्या हातात काही नाही. आज एवढे पैसे देता का तर कामाला येतो नाही तर मला वेळ नाही निघालो मी अशीच मजुरांची भाषा असते.
—-
-मिलिंद वायाळ,
ऊस उत्पादन शेतकरी होळ
——
१५० ची खुरपणी २०० पण जाऊन पोहचली. प्रत्येक घुरपणी ला वेगळा दर, उसातली खुरपणी असेल तर ३०० रुपये, एवढ पैसे देऊन पण आठ दिवस अगोदर मजूर बुकिंग करायचं आणि पुरुष मजूर रोजाने काम करण्यापेक्षा उक्त काम मागतात. दिवसाचे काम तासात करून ५०० रुपये मिळवायचे. - अशोक पवार शेतकरी मोरगाव (तरडोली)
———
मजूर टंचाई आणि मजुरीत वाढ हा तर कायमचाच प्रश्न आहे. मजुरांच्या आठ-आठ दिवस वेटिंगमुळे शेताची कामे वेळेत होत नाहीत. त्यामुळे काहीशा नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.
- प्रमोद देव : शेतकरी सुपे
———————————————
यंत्राने होणारी कामे
ट्रॅक्टरच्या साह्याने लागवडीची कामे केली जाते. मशागतीचीही कामासाठी वापर होतो. कापणीसाठी हारवेस्टरचा वापर केला जातो.
कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा
पूर्वी मशागतीच्या कामासाठी बैलांचा वापर केला जात होता. मात्र, त्यांची जागा आता ट्रॅक्टरने घेतली. जिल्ह्यात भात लावणीसाठीही यंत्राचा वापर केला जात आहे. ऊस तोडणीसाठीही अनेक ठिकाणी हार्वेस्टरचा वापर केला जातो. लागवड आणि काढणीसाठी आता केवळ मजुरांचा वापर केला जातो.