इंदापूर : उजनी पाणलोट क्षेत्रातील कालठण नं. १ ते पडस्थळ दरम्यानच्या नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटींवर महसूल विभागाच्या पथकाने हल्लाबोल करून जिलेटिनच्या स्फोटाद्वारे १० बोटी उद्ध्वस्त करून टाकल्या. तहसीलदार वर्षा लांडगे यांच्या नेतृत्वाखालील मंडलाधिकारी संतोष अनगरे, तलाठी मदन भिसे, राहुल पारेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. वाळू उपशाचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे कारवाईचा वेग वाढविण्यात येणार आहे. ती निरंतर चालू राहणार आहे, असे तहसीलदार लांडगे यांनी सांगितले. मात्र, महसूल विभागाचे कर्मचारीच वाळू व्यावसायिकांत सामील असावेत, असा संशय बळावतो, अशी स्थिती आहे. कालठण नं. १ ते तरटगावपर्यंतच्या पाणलोट क्षेत्रातील नदीपात्रात रात्री सातपासून पहाटेपर्यंत सुमारे २५० ते ३०० ट्रक वाळू वाहून नेली जाते. ७० ते ८० यांत्रिक बोटी अहोरात्र वाळूउपसा करत असतात. आजच्या कारवाईत दहा बोटी उडवल्या, तर ४० ते ५० बोटी पळाल्या आहे. तर, मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक झाली तरी महसूल वा पोलीस यंत्रणेच्या हाती केवळ तीन ते सहा वाहने सापडतात. पाणलोट क्षेत्राच्या पट्ट्यालगत सुमारे ३६ किलोमीटरचा पुणे-सोलापूर महामार्ग आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवरचे चालक कितीही चलाख असले, तरी ते महसूल व पोलीस यंत्रणेच्या डोळ्यांत सर्वकाळ धूळ टाकूच शकत नाहीत. (वार्ताहर)
वाळूच्या १० बोटी उद्ध्वस्त
By admin | Updated: June 24, 2016 02:00 IST