वडगाव निंबाळकर : केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने त्याचा परिणाम वडगाव निंबाळकर येथील दैनंदिन व्यवहारावर झाला आहे. त्यामुळे बाजारपेठेत जणू आर्थिक मंदीच आली असल्याचे दिसून येत आहे. त्यातच जिल्हा बँकांना पैसे स्वीकारण्यास रिझर्व बँकेने मनाई केली आहे. गावातील नागरिकांची, शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. परिणामी, बँकेत पाचशे, हजारच्या नोटा भरण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.वडगाव निंबाळकर हे आठवडी बाजारचे गाव असल्याने परिसरातील कोऱ्हाळे खुर्द, चोपडज, सदोबाचीवाडी, होळ, मुढाळे येथील नागरिक दैनंदिन खरेदीसाठी येथे येतात. मात्र, केंद्र सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने त्याचा व्यवहारावर परिणाम झाला आहे. व्यवहारात ५,१0, २0, ५0, १00 रुपयांच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे किराणा, कापड, मेडिकल दुकानात चिल्लरचा तुटवडा जाणवत आहे. गावात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक व बँक आॅफ महाराष्ट्र अशा बँका आहेत. पण, दोन्ही बँकापैकी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एटीएम सुविधा नाही. महाराष्ट्र बँकेचे एटीएमचे शटरच बंद आहे. त्यामुळे नागरिकांना बँकेत पैसे भरणा करण्यासाठी व पैसे काढण्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे. पोस्ट आॅफिसमध्ये पुरेसे पैसे उपलब्ध नसल्याने नोटा बदलून घेण्यासाठी सामान्य नागरिकांची बँका, पेट्रोलपंपासह विविध ठिकाणी एकच गर्दी होऊ लागली आहे. लहान-मोठे व्यावसायिक, दुकानदारांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे बाजारातदेखील शुकशुकाट जाणवत आहे. (वार्ताहर)
नोटाबंदीमुळे दैनंदिन व्यवहार ठप्प
By admin | Updated: November 17, 2016 01:29 IST