राजानंद मोरे, पुणेप्रवाशांना सक्षम बससेवा मिळावी यासाठी २००७ मध्ये पीएमटी व पीसीएमटी या परिवहन उपक्रमांचे एकत्रीकरण करण्यात आले. मात्र, या एकत्रीकरणानंतर अस्तित्वात आलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) बस अजूनही अडखळतच धावत आहे. तोट्यात चाललेल्या या सेवेमुळे प्रवाशांना चांगली सुविधा देणे तर दूरच, अनेकदा कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचाही प्रश्न निर्माण होताना दिसतो. पीएमटी व पीसीएमटीला स्थापनेपासून २००७ पर्यंत झालेल्या ४० ते ५० वर्षांतील संचलन तुटीची सरासरी पीएमपीने २००७ ते १४ या सात वर्षांतच गाठली आहे. त्यामुळे कंपनी अस्तित्वात आल्यानंतर ती पांढरा हत्ती ठरत आहे. एप्रिल २००७ पूर्वी पुणे व पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांसाठी स्वतंत्र परिवहन उपक्रम चालविले जात होते. पीएमटी व पीसीएमटीच्या बस दोन्ही शहरांतील प्रवाशांना सेवा पुरवीत होत्या. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी २००७ मध्ये हे दोन्ही उपक्रम एकत्र करून ‘पीएमपी’ची स्थापना करण्यात आली. मात्र, त्यानंतर आजतागायत ‘पीएमपी’ कधीही कंपनी म्हणून उभी राहू शकली नाही. दरवर्षी वाढत जाणाऱ्या तोट्यामुळे ती अधिक कमकुवत होत चालली आहे. दोन्ही महापालिकांच्या अनुदानाच्या कुबड्यांवरच ‘पीएमपी’ला मार्गावर यावे लागत आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांच्या नेमणुकीतील अडथळ्यांची शर्यत, घटती प्रवासी संख्या, व्यवस्थापन, समन्वय व नियोजनातील अभाव, पैशांअभावी बंद पडलेल्या बस अशा विविध कारणांमुळे पीएमपीची संचलन तूट दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पीएमपीतून मिळालेल्या माहितीनुसार, १९५१ ते २००७ या कालावधीत पीएमटीची तूट सुमारे १९६ कोटी २६ लाख रुपये होती, तर १९७४ ते २००७ या कालावधीत पीसीएमटीची तूट ५७ कोटी ७९ लाख रुपये एवढी होती. तर २००६-०७ या वर्षात अनुक्रमे ८४९ व २१२ बस अस्तित्वात होत्या. एप्रिल २००७ मध्ये पीएमपी ही कंपनी अस्तित्वात आल्यानंतर मार्च २०१४ पर्यंत तब्बल २५५ कोटी ३४ लाख रुपयांची तूट आहे. २०१३-१४ मध्ये बसेसची संख्या १४५१ एवढी होती. मागील वर्षभरात बसेसची संख्या सुमारे ६०० ने वाढली असती तरी तूट मात्र कमी झालेली नाही.व्यवस्थापन आणि नियोजनाचा अभावकंपनी होऊनही पीएमपीकडून प्रवाशांना चांगली सेवा मिळत नाही. त्याप्रमाणे बस ताफ्यातही उल्लेखनीय वाढ झालेली नाही. व्यवस्थापन व नियोजनाचाही मोठा अभाव दिसतो. त्यामुळे प्रवासी संख्येबरोबरच उत्पन्नही वाढविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. अद्याप सेवकवर्गाची आस्थापना, सेवाजेष्ठता यादी तसेच सेवक संख्येचे प्रमाण तयार करण्यात आलेले नाही. दोन्ही पूर्व उपक्रमांच्या आस्थापनेनुसारच सेवकांची पदे अस्तित्वात आहेत. कंपनी निर्माण झाल्यानंतर स्वबळावर आगारांची उभारणी, बसताफा वाढविणे, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण, मार्गांचे पुनर्नियोजन, प्रवासीसंख्येत वाढ करण्यात प्रशासन असमर्थ ठरले आहे. एकत्रीकरणाचा फेरविचार करा ४पीएमटी व पीसीएमटीचे एकत्रीकरण करूनही तूट वाढत असल्याने याचा फेरविचार करावा, अशी मागणी पीएमटी कामगार संघ (इंटक) या कामगार संघटनेने पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली आहे. संघटनेचे सरचिटणीस नुरुद्दीन इनामदार, कार्याध्यक्ष रामचंद्र पवार, उपाध्यक्ष अशोक जगताप, सहचिटणीस उल्हास बनकर व विकास देशमुख यांनी चार दिवसांपूर्वीच बापट यांच्याकडे हे गाऱ्हाणे मांडले. संघटनेच्या या मागणीवर पालकमंत्रीही सकारात्मक असल्याचे इनामदार यांनी सांगितले. पीएमटी व पीसीएमटी स्वतंत्र असताना जी दशा होती तीच कशा कंपनी अस्तित्वात आल्यानंतर आहे. ना प्रवाशांना चांगली सेवा मिळाली, ना उत्पन्न वाढले. संस्थात्मक स्वरूप बदलून दर्जेदार सेवा मिळते असा अनुभव नाही. त्यामुळे पुन्हा स्वतंत्र होऊन स्वस्त, सुरक्षित, सक्षम व भरवशाची बससेवा मिळेल, याची खात्री नाही. प्रवाशांना केवळ चांगली सेवा मिळायला हवी. मग ती पीएमपी देवो वा पीएमटी, याने काहीही फरक पडत नाही. ही सेवा कशी व कोण देणार याचे उत्तर अधिकारी व कामगार संघटनाही देत नाहीत. - जुगल राठी, अध्यक्ष, पीएमपी प्रवासी मंच
कंपनीने घातली तुटीत भर
By admin | Updated: July 6, 2015 05:26 IST