उरुळी कांचन : बारावीच्या परीक्षेसाठी जात असलेल्या चैतन्य गवळी या विद्यार्थ्याच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ उरुळी कांचनमध्ये आज (दि. २) कडकडीत बंद पाळण्यात आला.महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा नागरिकांनी निषेध केला. जिल्हा परिषद सदस्य अशोक कसबे, भाजपाचे सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील कांचन (पाटील), पंचायत समिती सदस्य काळूराम मेमाणे यांच्या नेतृत्वाखाली उरुळी कांचन गावातून सकाळी ११ वाजता भव्य मूकमोर्चा काढण्यात आला. यात बोरीभडकचे असंख्य नागरिक हातात चैतन्यचा फोटो घेऊन सहभागी झाले होते.मोर्चा उपोषणस्थळी पोहोचल्यावर त्याचे रूपांतर सभेमध्ये झाले. या वेळी बोरीभडकचे माजी सरपंच अशोक काळे यांनी तीव्र निषेध केला. भाजपाचे सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील कांचन यांनी सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याबाबत मागणी केली. महात्मा गांधी सर्वोदय संघाच्या विश्वस्तांना शाळा व महाविद्यालयातील गैरप्रकार थांबवता येत नसतील तर पदावरून पायउतार व्हा, असे आवाहन केले. भाजपा व शिवसेना कार्यकर्त्यांनी केलेल्या लाक्षणिक उपोषणस्थळी शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे व दौंडच्या माजी आमदार रंजना कुल यांनी भेट दिली. उपोषणाला पाठिंबा असल्याचे सांगितले. मोर्चात ग्रामपंचायत सदस्य युवराज कांचन, सुनील दीक्षित, अमित कांचन, संतोष गायकवाड, भाजपाचे व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष विकास जगताप, एम. जी. शेलार, राजेंद्र तावरे, नवनाथ गव्हाणे, अशोकराव काळे, नामदेव बोराटे, सचिन मचाले, आबासाहेब आतकिरे, दीपक आतकिरे, मोहन म्हेत्रे, मंगेश भोसेकर, बोरीभडकच्या सरपंच अनिता गव्हाणे, वैशाली शिंदे, शांताबाई शेळके, कल्पना गवळी, यांच्यासह उरुळी कांचन व बोरीभडकचे ग्रामस्थ सहभागी झाले होते.
उरुळी कांचनमध्ये बंद
By admin | Updated: March 2, 2015 23:26 IST