पुणे : मेट्रोच्या वनाज ते रामवाडीच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गात बदल करून तो भुयारी करण्याची सूचना काही तज्ज्ञ व लोकप्रतिनिधींनी मांडल्या. त्यावर मेट्रो मार्गाविषयीची मते व म्हणणे सर्व तज्ज्ञांनी आठ दिवसांत महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे देण्याची सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री बापट यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांच्या समितीला एक महिन्यात अहवाल देण्याची सूचना केली होती. त्यानुसार बापट यांच्या उपस्थितीत तज्ज्ञ व आमदारांची पहिली बैठक मुंबई मंत्रालयात बुधवारी झाली. त्या वेळी आमदार मेधा कुलकर्णी, विजय काळे, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, आयुक्त कुणाल कुमार, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे (डीएमआरसी) माजी व्यवस्थापकीय संचालक ई. श्रीधरन, उद्योगपती अरुण फिरोदिया, शशीकांत लिमये, रमेश राव आदी उपस्थित होते. ‘डीएमआरसी’ने मेट्रोचा सविस्तर अहवाल (डीपीआर) सादर करून बरीच वर्षे झाली आहेत. त्यामुळे डीपीआरमध्ये बदल करता येईल, असे कुणाल कुमार यांनी सांगितले. मात्र, एकदा डीपीआर केल्यानंतर त्यामध्ये बदल करणे अडचणीचे आहे, असे करीर म्हणाले. (प्रतिनिधी)
वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गात बदल करा
By admin | Updated: March 12, 2015 06:19 IST