पुणे : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णाचे वैद्यकीय बिल माफ करण्यात येणार आहे. त्याबाबतचा निर्णय बोर्डाच्या आरोग्य समितीने घेतला आहे. त्यामुळे रुग्ण दगावल्यानंतर यापुढे नातेवाइकांकडून वैद्यकीय बिलाची थकबाकी वसूल केली जाणार नाही.मे महिन्यात बोर्डाच्या रुग्णालयामध्ये २ रुग्ण उपचार सुरू असताना मरण पावले होते. एका रुग्णाच्या उपचारांचे ५ हजार, तर अन्य एका रुग्णाचे २ हजार ६०० रुपये वैद्यकीय बिल झाले होते. रुग्ण दगावल्यानंतर आप्तांकडून बिल वसूल करण्याचा प्रकार योग्य नसल्याबाबत आरोग्य समितीच्या बैठकीत मत व्यक्त झाले. त्यानंतर यापुढे रुग्ण दगावल्यास संबंधित रुग्णाच्या आप्तांकडून वैद्यकीय बिलाची थकबाकी वसूल न करण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, बोर्डाच्या विविध रुग्णालयांमध्ये जानेवारी ते जून या कालावधीत दाखल झालेल्या रुग्णांचा अहवाल रुग्णालय प्रशासनाने आरोग्य समितीत सादर केला. गेल्या ६ महिन्यांत ४९ हजार १५६ रुग्णांवर विविध प्रकारचे उपचार करण्यात आले. त्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमध्ये ३२ हजार ८८१, परमार डिस्पेन्सरीमध्ये ४ हजार १६८, मार्केट डिस्पेन्सरीमध्ये ४ हजार ४३२ आणि घोरपडी डिस्पेन्सरीमध्ये ७ हजार ६७५ रुग्णांवर उपचार झाले. (प्रतिनिधी)
रुग्णाचा मृत्यू झाल्यास बिल माफ
By admin | Updated: August 22, 2015 02:19 IST