पुणे : शेतकऱ्यांवर प्रतिकूल परिणाम करणारे कृषी कायदे रद्द करा, या मागणीसाठी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी बचाव कृती समितीने २६ जानेवारीला ‘बैलगाडी मोर्चा’चे आयोजन केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, शेतकरी कामगार पक्षाचे शहराध्यक्ष सागर आल्हाट, रिक्षा पंचायतीचे नितीन पवार, लोकायतचे नीरज जैन, अलका जोशी आदी या वेळी उपस्थित होते.
काकडे म्हणाले की, २६ जानेवारीला सकाळी ११ वाजता पुणे महानगरपालिकेतील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात होईल. जोगेश्वरी मंदिराजवळील भाजपा कार्यालयाजवळ खासदार गिरीश बापट यांना निवेदन देऊन हा मोर्चा संपेल.