लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीचा फटका बसल्यानंतरही जिल्ह्यातील १ हजार ९२५ गावांपैकी सर्वांचे उत्पन्न अर्ध्यापेक्षा जास्तच आहे. खरीप हंगामाच्या सरकारी पाहणीनंतर नुकताच पैसेवारीचा अहवाल जाहीर करण्यात आला असून, त्यात जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त निदर्शनास आली आहे.
जिल्ह्यात पुणे शहरासह १५ तालुके आहेत. त्यात मिळून १ हजार ९२५ गावे आहेत. त्यातील दौंड, बारामती व इंदापूर हे तीन तालुके रब्बी हंगामाचे आहेत. त्या तालुक्यातील ५४३ गावे खरीप हंगामात जमेस धरत नाहीत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व हवेली तालुक्यातील काही गावे शहरी हद्दीत समाविष्ट आहेत. काही तालुक्यांमधील गावे ओसाड आहेत. काही गावे धरणासाठी संपादित झाली आहेत. अशा एकूण गावांची संख्या ६९ आहे. त्याशिवाय उर्वरित १२ तालुक्यात मिळून १ हजार ३७९ गावे खरीप हंगामाची आहेत. तिथे पैसेवारी मोजली जाते.
दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये सरकारी मदत देण्यासाठी म्हणून गावांची पैसेवारी मोजली जाते. त्यासाठी त्या गावांचे मागील १० वर्षांचे सरासरी उत्पन्न काढतात. आपत्तीमध्ये त्यापेक्षा कमी उत्पन्न होत असेल तर ते गाव दुष्काळी जाहीर केले जाते व त्याला त्वरित सरकारी मदत मिळते. सप्टेबर ऑक्टोबरमधील अतिवृष्टीनंतर सरकारने केलेल्या पाहणीत जिल्ह्यात असे एकही गाव आढळलेले नाही.
एकूण १ हजार २९८ गावांची पाहणी करून सन २०२०-२१ साठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पैसेवारी जाहीर करण्यात आली. पैसेवारी जाहीर न केलेल्या गावांची संख्या ६२४ आहे. अतिवृष्टीचा फटका सर्वच तालुक्यांमधील गावांना बसला होता. त्याचे पंचनामे होऊन त्यांना त्याची नुकसानभरपाईही मिळू लागली आहे. मात्र, थेट दुष्काळ किंवा सरासरी उत्पन्न घटले असे एकही गाव पैसेवारीनुसार जिल्ह्यात नाही.