पुणे : ''चार पिढ्यानंतर आता आमच्या दारात पाणी आलंय, नाय तर त्या डोंगराहून पाणी आणावं लागायचं बाबा ! आमी कसं बी पालापाचोळा खाऊ पण पाण्याचं काय करणार बा ! उन्हा-तान्हाचं आम्हाला किती तरी मैल पाण्यासाठी हिडावं लागायचं. पण आता दारात पाणी पाहून लय आनंद व्हतंय बाबा !'' या भावना आहेत सुलाबाई ढेबे यांच्या.
वेल्हा तालुक्यात काही कामानिमित्त मी माझ्या गाडीने जात होतो. तेव्हा एका आजीबाई मला रस्त्यातून चालताना दिसल्या. त्या दळण करण्यासाठी पायपीट करत होत्या. त्यानंतर त्यांच्याशी बोलल्यावर त्यांच्या अनेक समस्या उलगडल्या. त्यात पाण्याची समस्या गंभीर असल्याचे समोर आले. डोंगरावरून पाणी आणावे लागत असल्याचे पाहिले. त्यामुळे त्यांच्यासाठी २६०० फूटांची पाइपलाइन टाकून त्यांच्या दारात पाणी आणले. - लोकेश बापट, टेल्स ऑर्गनायझेशन संस्था
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही डोंगरावरील टाकवेतून पाणी आणतोय. तिथं जीवंत झरा असल्याने बारामाही पाणी असते. त्यामुळे आमच्या जगण्यासाठी ते टाकवे हेच आवश्यक बनले आहे. कारण इतर कुठेही पाणी नाही. परंतु, आता पाइपलाइन झाल्याने आम्हाला डोंगरावर जाऊन पाणी आणावे लागणार नाही. - रामभाऊ ढेबे, ग्रामस्थ, पोळे गाव