पुणे : कोणत्याही आपत्तीग्रस्तांबाबत सहवेदना असणे महत्त्वाचेच आहे; मात्र ती कृतीत उतरली तरच जास्त प्रभावी व उपयोगी ठरते, असे प्रतिपादन डॉ. बाबा आमटे यांचे नातू कौस्तुभ आमटे यांनी केले. बाबांच्या आनंदवन संस्थेच्या वतीने दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील युवकांना रोजगार मिळावा म्हणून प्रशिक्षण देत असल्याची माहितीही त्यांनी दिली.पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस भवन येथे कौस्तुभ यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना १० टन धान्य पाठविण्यात आले. उपमहापौर मुकारी अलगुडे, पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, आमदार सुभाष झांबड, आमदार दीप्ती चवधरी, माजी आमदार उल्हास पवार आदी या वेळी उपस्थित होते.बागवे यांनी आपत्तीच्या काळात धावून जाणे हे काँग्रेसचे वैशिष्ट्य असल्याचे सांगितले. पंतप्रधान जगभर फिरतात; मात्र महाराष्ट्रातील दुष्काळाकडे त्यांनी दुर्लक्ष केले असल्याची टीका त्यांनी केली. विश्वजित कदम यांनी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने आनंदवन उपक्रम पाहून यावा व त्यात सहयोग द्यावा, असे आवाहन केले. उल्हास पवार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व आनंदवन यांचा संबंध उलगडून दाखविला. पालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, नगरसेवक अभय छाजेड, सुधीर ज्यानजोत, माजी आमदार मोहन जोशी, गोपाळ तिवारी, तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. अजित दरेकर यांनी सूत्रसंचालन केले. माजी महापौर कमल व्यवहारे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
आत्मीयतेबरोबरच कृती हवी : आमटे
By admin | Updated: June 23, 2016 02:28 IST