पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्यानंतर, तिच्याशी लग्न केल्यानंतरही आरोपीला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी हा आदेश दिला. लग्न केल्याने बलात्काराच्या गुन्ह्याचे गांभीर्य कमी होत नसल्याचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला.या प्रकरणातील पीडित मुलगी बलात्कारामुळे गरोदर राहिली होती. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपीने तिच्याबरोबर लग्न केले. मात्र, घटनेच्या वेळी ती अल्पवयीन होती. त्यामुळे तिच्यावर बलात्कारच झाला असल्याचा मुद्दा सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला दया न दाखवता सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा झालेला २४ वर्षीय आरोपी विश्रांतवाडीतील कळस-माळवाडी येथे राहायला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद दिली होती.बलात्कार झाला त्यावेळी पीडित मुलीचे वय १६ होते. आरोपीला ती अल्पवयीन आहे, याची कल्पना असतानाही त्याने तिच्याशी जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले होते. त्यातून ती गरोदर राहिली होती. मात्र, हा प्रकार सुरुवातीला तिने घरी सांगितला नव्हता. २७ जानेवारी २०१७ रोजी ती घरातील स्वच्छतागृहात गेली. बराच वेळ बाहेर आली नाही. म्हणून तिच्या आईने तिला आवाज दिला.काही वेळाने तिने दरवाजा उघडला असता पीडितेचा गर्भपात झाल्याचे आईने पाहिले. घाबरलेल्या आईने तिला व गर्भाला तातडीने ससून हॉस्पिटल येथे दाखल केले होते. तिथे डॉक्टरांनी गर्भाला मृत घोषित केले. तर डॉक्टरांनी पीडितेचे, तिच्या गर्भाचे आणि आरोपी पाटील याच्या रक्ताचे नमुने डीएनए तपासणीसाठी काढून घेतले होते. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मंगल जोगन यांनी केला होता. अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. तर न्यायालयीन कामकाजातविश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार के. बी. जगताप यांनी साह्य केले.खटल्यात पीडित मुलगी, तिची आई, तपासी अंमलदार यांची साक्ष नोंदविण्यात आली. पीडित मुलीच्या वयाचा पुरावा, डीएनए तपासणी अहवाल पुरावा म्हणून महत्त्वाचे ठरले. घटनेच्या वेळी पीडित मुलगी अल्पवयीन होती. आरोपीने घटनेनंतर तिच्याबरोबर विवाह केला असला, तरी त्यामुळे घटनेचे गांभीर्य कमी होत नाही, असे सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.पीडिता आणि आरोपी राहत एकत्रगुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची काही दिवसांनी जामिनावर सुटका झाली होती. दरम्यान, त्याने पीडितेबरोबर लग्न केले होते. लग्न झाल्यानंतर दोघेही बरोबर राहत. सुनावणीसाठी दोघेही बरोबर न्यायालयात येत. मात्र, गुन्ह्याची मूळ फिर्याद दाखल असल्याने या प्रकरणाची सुनावणी झाली व आरोपीला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावल्यानंतर आरोपीला पुन्हा अटक करण्यात आली आहे.
पीडितेशी लग्न केल्यानंतरही आरोपीला सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 04:06 IST