मोशी : मोशीतील शिवाजीवाडी परिसरामध्ये ऐन पावसाळ्यामध्ये अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमधून प्रशासनाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. परंतु, रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी तासन्तास नळावर पाण्याची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाजामध्ये अडचणीचे ठरत आहे. शिवाजीवाडीमध्ये आठ दिवसांपासून रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या भागात दररोज सकाळी ८.३० ते १०पर्यंत पाण्याची वेळ असल्याचे सांगण्यात येते. परंतु, प्रत्यक्षात मात्र पाणी येतच नसून, अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. उन्हाळ्यामध्ये जेवढा त्रास नाही, त्यापेक्षा अधिक त्रास पावसाळ्यामध्ये सहन करावा लागत असल्याची तक्रार महिलावर्गातून केली जात आहे. या भागात कामगारवर्गाचे प्रमाण जास्त आहे. पिण्याच्या पाण्यामुळे अनेकांना कामे सोडून घरी थांबावे लागत आहे. तसेच. रहिवाशीवर्गाकडून मीटरप्रमाणे पाणीबिल घेतले जात असतानाही नाहक त्रास सहन करण्याची वेळ रहिवाशीवर्गावर येऊन ठेपली आहे. या भागातील पाणीपुरवठा नियमित करण्यात यावा. तसेच, जास्त दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी नामदेव सस्ते, तुकाराम सस्ते, विलास मोहिते, अतुल वाळुंज यांनी केली आहे. याबाबत पाणी विभागाचे अधिकारी प्रशांत कोतकर म्हणाले, ‘‘या भागातील जलवाहिनीचे काम सुरू आहे. लवकरच नियमित पाणीपुरवठा सुरू होईल.’’(वार्ताहर)
ऐन पावसाळ्यात मोशीत पाणीटंचाई
By admin | Updated: August 8, 2015 00:26 IST