रावेत : येथील पुलाकडून प्राधिकरणाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरणाचे संथ गतीने सुरू असल्याने वाहनचालकांना खडी आणि धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाकडे जाण्यासाठी , तसेच रावेत, किवळे आणि देहूरोड येथील नागरिकांना पुण्यात जाण्यासाठी याच चौकातून जावे लागते. चौकात वाल्हेकरवाडी, आकुर्डी रेल्वे स्टेशन, रावेत, किवळे, रावेत गावठाण आदी भागांत जाण्यासाठी या चौकातून जावे लागते. त्यामुळे वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात असते. वाहनांची संख्या जास्त असल्याने येथील चौक वाहतुकीसाठी अपुरा पडत होता. यासाठी या चौकाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. मात्र, दोन महिने उलटून गेले, तरी या रस्त्याचे काम अद्यापही अर्धवटच आहे. मात्र, संथ गतीने सुरू असलेल्या या कामाचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर सध्या अर्धवट डांबरीकरण केले असून, रस्त्यावर बारीक खडी सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे या चौकात धुळीचे लोट उठत आहेत. दुचाकीचालकांना वाहन चालवणे कठीण होत आहे. अनेक दुचाक्या घसरून अपघात झाले. (वार्ताहर)
रावेत रस्त्याचे काम संथ गतीने
By admin | Updated: October 13, 2016 01:55 IST