अपुऱ्या खाटांमुळे एका बेडवर झोपवलेले दोन-दोन रुग्ण...हाणामारीच्या घटनेतील जखमीसोबत समर्थकांचा लोंढा घुसला. घाबरून जाणारे सुरक्षारक्षक...प्रतितासास शुल्क आकारूनही बेशिस्त असलेले वाहनतळ...रुग्ण, नातेवाईक यांची गर्दी असूनही बंद पडलेल्या लिफ्ट...ही परिस्थिती आहे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील. कमी खर्चात चांगले उपचार मिळतील, या अपेक्षेने येणाऱ्या रुग्णांना कशी सेवा मिळते, याचा शोध घेण्यासाठी ‘पत्रकारिता परमो धर्म’ या उपक्रमांतर्गत ‘लोकमत टीम’ने रविवारी दिवसभर वायसीएममध्ये विविध निरीक्षणे नोंदविली. पिंपरीतील संत तुकारामनगर येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेल्या रुग्णालयात ७५० खाटांची सुविधा आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार रुग्णालयात रुग्णांची संख्याही वाढत आहे. तसेच मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड या तालुक्यांतीलही रुग्ण येथे दाखल होतात. त्यामुळे येथे नेहमीच रुग्णांची संख्या अधिक असते. या रुग्णालयातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे सुरक्षाव्यवस्था आहे. मात्र, ‘लोकमत टीम’ने केलेल्या पाहणीत वायसीएमची सुरक्षाव्यवस्थाच रामभरोसे असल्याचे दिसून आले. संत ज्ञानेश्वर प्रवेशद्वारातून आत सोडले जाते. येथे प्रत्येकाची तपासणी करूनच आत सोडणे आवश्यक आहे. त्यासाठी सुरक्षारक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. यासह सर्वांत महत्त्वाचा विभाग असलेल्या तातडिक विभागातही हीच प्रक्रिया आहे. मात्र, सुरक्षारक्षकांकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे दिसून आले. दुपारी साडेबाराला पिंपरीत दोन सराईत गुंडांची हाणामारी झाली होती. या घटनेतील दोन्ही जखमींना येथे उपचारासाठी आणले होते. तातडिक विभागात त्यांना दाखल केले होते. या दोन्हींचे समर्थकही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमले होते. जखमींवर उपचार सुरू असलेल्या ठिकाणीच त्यांनी गर्दी केली होती. तातडिक विभागाच्या प्रवेशद्वारातून सर्व जण थेटपणे आत जात होते. त्या वेळी प्रवेशद्वारात एक सुरक्षारक्षक होता. मात्र, आत जाणाऱ्या कोणालाही हटकले जात नव्हते. गर्दी झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याचा त्रास इतर रुग्णांना होत होता. सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या सर्व कॅमेऱ्यांतून होत असलेले चित्रीकरण पाहण्यासाठी संत ज्ञानेश्वर प्रवेशद्वाराशेजारीच नियंत्रण कक्ष आहे. येथील स्क्रीनवरून सुरक्षारक्षकाने रुग्णालयातील घडामोडींवर लक्ष ठेवणे आवश्यक असते. मात्र, रविवारी सकाळी सव्वाअकरा ते बारा या वेळेत या कक्षात पाहणी केली असता येथे एकच कर्मचारी होता. मात्र, तोही बाहेरील दिशेने खुर्ची टाकून बसला होता. त्याचे लक्षही स्क्रिनकडे नसून बाहेरच होते. या दरम्यान त्याने एकदाही नजर टाकण्याची तसदी घेतली नाही. येथील शवागृह परिसरातही अपुरी सुरक्षाव्यवस्था आहे. या ठिकाणी रुग्णांचे नातेवाईक सहज प्रवेश करू शकतात. येथे असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळते. तसेच, त्यांची अडवणूक केली जाते.मी खासदार बोलतोय... आमदार बोलतोय....महापौर बोलतोय... नगरसेवक बोलतोय... आपल्या कार्यकर्त्याचा नातेवाईक रुग्णालयात दाखल असून, ‘आयसीयू’ची गरज आहे. त्याला आयसीयू उपलब्ध करून द्या, असे डॉक्टरांना सांगितल्यानंतर आयसीयू उपलब्धही होतो. मात्र, ज्याची कोणासोबत ओळखच नाही, मात्र आयसीयू हवा आहे, अशांना इतर रुग्णालयांत जाण्याचा सल्ला दिला जात असल्याचे निदर्शनास आले. आयसीयू विभाग रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर असून, एकूण २६ खाटांची सुविधा या विभागात आहे. अत्यवस्थ रुग्णांना ‘आयसीयू’त दाखल केले जाते. रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे अनेकदा तिथे खाट उपलब्ध होत नाही. त्यामुळे १० ते १५ रुग्ण प्रतीक्षा यादीवर असतात. अशा वेळी काही रुग्णांना तातडिक विभागातच ठेवले जाते, तर काहींना पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविले जाते. यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.याबाबत रविवारी सकाळी १२ वाजता ‘आयसीयू’मधील एका रुग्णाच्या नातेवाइकाला विचारणा करण्यात आली, ‘तुम्हाला ‘आयसीयू’ कसा उपलब्ध झाला?’ त्यावर ते म्हणाले, ‘आमच्या रुग्णाला एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, तेथील डॉक्टरांनी ‘आयसीयू’ची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आयसीयूबाबत विचारणा केली. मात्र, आयसीयू उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.’‘यानंतर आमच्या प्रभागातील एका नगरसेवकाला याबद्दल सांगितले. त्यांनी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आयसीयूमध्ये दाखल करून घेण्यासाठी सांगितले. त्यानंतर लगेच रुग्णालयात दाखल केले. नगरसेवक आमच्या ओळखीचे असल्यामुळेच आयसीयू उपलब्ध झाला.’
हेळसांड, चिडचिड, बेशिस्त...
By admin | Updated: August 4, 2015 03:41 IST