अंकलीतून उत्साहात प्रस्थान : शितोळे सरकारांकडून परंपरागत पाठवणी आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायीवारी सोहळ्यासाठी ह्यश्रींह्णच्या अश्वांचे प्रस्थान अंकलीतील राजवाड्यातून शुक्रवारी उत्साहात झाले असून, ते अलंकापुरीकडे रवाना झाले आहेत. या वेळी अंकली परिसरातील ग्रामस्थ आणि दिंडीप्रमुख वारकरी या प्रसंगी उपस्थित होते.श्रींच्या अश्वांचे वैभवी प्रस्थान सोहळा अंकलीकर श्रीमंत शितोळे सरकार यांनी प्रथापरंपरांचे पालन करीत उत्साहात पार पडला. अंकली गावातील राजवाड्यातून श्रींचे अश्वांचे हरिनाम गजरात प्रस्थान झाल्यानंतर अंकली नगरप्रदक्षिणा, महाप्रसाद झाल्यावर मांजरीवाडी, कागवाडमार्गे म्हैसाळ, त्यानंतर सांगलीमार्गे सांगलवाडीत पहिला मुक्काम होणार आहे. आळंदीकडे प्रवास करून पुण्यनगरीत दोन दिवसांचे मुक्कामासाठी (दि. २५ व २६) थांबणार आहेत. पुण्यनगरीतील दोन दिवसांचा पाहुणचार घेत आळंदीला (दि. २७) हरिनाम गजरात पोचणार आहेत. येथील वेशीवर श्रींच्या अश्वांचे आळंदी देवस्थान आणि सोहळ्यातील प्रथापरंपरांचे पालन करीत स्वागत होईल. तत्पूर्वी पुणे-आळंदी मार्गावरील श्रीकृष्ण मंदिरात (बिडकरवाडा) सरदार हरप्रीतसिंह बिडकर परिवाराच्या वतीने स्वागत होणार आहे. ११ दिवसांच्या प्रवासानंतर श्रींचे अश्व आळंदी मंदिरात पूजादर्शन स्वागत झाल्यानंतर येथील फुलवाले धर्मशाळेत मुक्कामी राहणार आहेत.श्रींच्या अश्वांचे प्रवास नियोजन श्रीमंत सरकार ऊर्जितसिंह शितोळे अंकलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. अश्वचालक व व्यवस्थापक म्हणून तुकाराम कोळी प्रवासात काम पाहणार असल्याचे श्रीमंत सरकार महादजीराजे शितोळे सरकार(अंकलीकर) यांनी सांगितले.