राजगुरुनगर : खेड तालुक्यात दोन दिवस पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे. बी-बियाणे आणि खते खरेदीसाठी कृषी साहित्याच्या दुकानांमध्ये त्यांची लगबग सुरू होती. खेड तालुक्यात दोन दिवस मोसमी पाऊस झाला. त्यामुळे खरीप पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी बी-बियाणे आणि खतांच्या दुकानामध्ये जाऊन बियाण्यांची खरेदी आणि चौकशी करीत होते. खरिपाची तयारी म्हणून शेतकऱ्यांनी बी-बियाण्याची खरेदी सुरू केली होती, पण मृग नक्षत्र कोरडे गेल्याने त्यांनी खरेदी लांबणीवर टाकली होती. पण गेल्या दोन दिवसाच्या पावसाने त्यांनी पुन्हा तयारी सुरू केली. येथील दुकानदार बाबूशेठ कर्नावट आणि मनोज कर्नावट म्हणाले, ‘‘आमच्या अंदाजानुसार फक्त १० टक्के पेरण्या झाल्या आहेत. भातरोपांच्या ७० टक्के पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीनच्या २० टक्के पेरण्या झाल्या आहेत. बाकी सर्व पेरण्या होणे आहेत. सुमारे ४० टक्के शेतकऱ्यांनी आधीच बी-बियाणे खरेदी केलेले आहे. पाऊस लांबल्याने बाकी बहुतांश शेतकरी खरेदीला फिरकले नाहीत. आता थोडीशी सुरुवात झाली आहे. भाताच्या इंद्रायणी, पार्वती, ८१० आणि फुले-समृद्धी या वाणांच्या बियाण्यांना मागणी जास्त आहे. (वार्ताहर)पाऊस कमी जास्त झाला तरी तग धरते, म्हणून सोयाबीन पिकाच्या पेरणीकडे कल वाढला आहे. पाऊस कमी झाला तरी विहीर किंवा उपसा योजनेचे पाणी देता येते, म्हणून भाजीपाला करण्याचे प्रमाण वाढले आहे. राजगुरुनगर परिसरात पेरभात करण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडे खरिपात भुईमूग व बाजरी पेरण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
बियाणे, खते खरेदीसाठी लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 14:56 IST