कामशेत : मावळात जागेच्या हव्यासापोटी महामार्गालगत तसेच नैसर्गिक ओढे-नाल्यांवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. काही ठिकाणी तर ओढ्याचा मार्गच बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही ठिकाणी ओढे-नाल्यांत भराव टाकून त्यांचे अस्तित्वच संपवले जात आहे. यातून पावसाळ्यात अनेक धोके संभवत असून, प्रशासकीय पातळीवर मात्र याबाबत उदासीनता आहे.कामशेत शहराला लागून असलेल्या मुंबई-पुणे महामार्गावर वडगाव मावळ, कान्हे, नायगाव, कामशेत, पाथरगाव, कार्ला अशी अनेक गावे आहेत. या महामार्गावर ठिकठिकाणी अनेक व्यावसायिकांनी व्यवसाय थाटले आहेत. यात नर्सरी, हॉटेल व ढाब्यांचे प्रमाण जास्त आहे. काही ठिकाणी शिक्षणसंस्थाही आहेत. पावसाळ्यापूर्वी काही व्यावसायिकांकडून सर्रास नैसर्गिक ओढे-नाले यांचा मार्ग बदलणे, भराव टाकणे अशा प्रकारची कामे होत असतात. अनेक ओढे-नाल्यांवर अतिक्रमण आहे. त्यामुळे यामुळे ओढ्यांच्या पात्राची रुंदी कमी झाली आहे. पावसाळ्यात येणारे पाणी वाहून जाण्यासाठी जागा राहत नसल्याने हे पाणी महामार्ग व लोहमार्गावर येऊन सर्व वाहतूक ठप्प करत आहे. मावळ तालुक्यातील महामार्गाजवळच्या डोंगरांमधून येणारे पावसाचे पाणी ओढे-नाल्यांमधून वाहत असते. प्रशासनाने यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी मोऱ्यांची व्यवस्था केली आहे. या मोऱ्यांमधून पाणी पुढे वाहत असते. पण, काही वर्षात महामार्गाच्या बाजूला अनेक धनदांडग्यांनी व व्यावसायिकांनी जमिनी खरेदी करून वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत. अनेकांनी जागेच्या हव्यासापोटी ओढे-नाल्यांवर प्रशासकीय अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून अतिक्रमणे केली आहेत. जागा बळकावल्यामुळे ओढे-नाल्यांच्या पात्रांची रुंदी कमी झाली आहे. यातूनच मागील वर्षी पावसाचे पाणी महामार्ग व लोहमार्गावर येऊन पाच ते सहा तास वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या तीन-चार फूट उंचीवरून पावसाचे पाणी वाहत होते. या पाण्याच्या प्रवाहात काही दुचाकी वाहने वाहून गेली. हा निसर्गाचा कोप नव्हता, तर मानवनिर्मित चुकांमुळे ओढवलेला प्रसंग होता, हे शासनाच्या लक्षात येत नाही. नर्सरीचालक, हॉटेल व ढाबा व्यावसायिक, शिक्षणसंस्था यांचे व महसूल विभाग, तहसीलदार कार्यालय, ग्रामपंचायती यांचे आर्थिक लागेबंध असल्याने या अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई होत नाही, अशी नागरिक तक्रार करतात. शासनाकडून कारवाई होते, ती फक्त नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी. सर्व्हे करून ओढे-नाल्यांची हद्द कायम केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. पण, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या पावसाळ्यातही मागील वर्षी झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होईल, अशी लोकांकडून भीती व्यक्त केली जात आहे. शासनाने गंभीरतेने याविषयी निर्णय घेऊन अतिक्रमणे काढावीत व ओढे-नाल्यांची हद्द कायम करावी, अशी लोकांकडून मागणी होत आहे. या अतिक्रमणांवर कारवाई न केल्यास महामार्ग, लोहमार्ग पाण्याखाली जातीलच, शिवाय आजूबाजूच्या घरात पाणी शिरून पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांचे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
ओढे-नाल्यांवर अतिक्रमण
By admin | Updated: June 23, 2016 02:01 IST